अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लादल्यानंतर चीन आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारताना दिसत होते. परंतु चीन भारतासोबत दुहेरी खेळ खेळत आहे. त्यांनी भारताला रेअर अर्थ मॅग्नेट, खतं आणि औषधांचा पुरवठा पुन्हा सुरू करण्याबद्दल विधान केलंय. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी चीनच्या जुन्या प्रस्तावाला भारतानं सहमती दर्शवलीये. तसंच, दोन्ही देशांमधील थेट उड्डाणं आणि व्यावसायिक संबंध पुन्हा सुरू होत आहेत. भारत चिनी व्यावसायिकांसाठी व्हिसा नियम देखील सुलभ करू शकतो. परंतु दुसरीकडे, चीन भारताला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी आपल्या इंजिनिअर्सना परत बोलावत आहे.
अलिकडेच बातमी आली की अॅपल अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी आयफोन १७ चे सर्व मॉडेल्स भारतात बनवणार आहे. अमेरिका यामुळे खूप नाराज आहे. आता चीननं पुन्हा एकदा त्यांचे सुमारे ३०० इंजिनिअर्स परत बोलावले आहेत. तैवानची कंपनी फॉक्सकॉनची एक सहाय्यक कंपनी युझान टेक्नॉलॉजी, जी अॅपलसाठी सर्वाधिक आयफोन बनवते, तिनं भारतात काम करणाऱ्या सुमारे ३०० चिनी इंजिनिअर्सना परत बोलावलंय.
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
कंपनीची भारतात गुंतवणूक
सूत्रांनुसार, फॉक्सकॉन ग्रुपला हे दुसऱ्यांदा करावं लागलं आहे. हे अशा वेळी घडत आहे जेव्हा भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये काही सुधारणा दिसून येत आहेत. यापूर्वी २ जुलै रोजी, फॉक्सकॉनला भारतातील त्यांच्या आयफोन उत्पादन प्रकल्पांमधून सुमारे ३०० चिनी इंजिनिअर्स आणि टेक्निशिअन्सना परत बोलावण्यात आलं होतं अशी बातमी आली होती.
युसन टेक्नॉलॉजीज तामिळनाडूमध्ये १३,१८० कोटी रुपये खर्च करून डिस्प्ले मॉड्यूल असेंब्ली युनिट उभारणार आहे. फॉक्सकॉनने मे महिन्यात शेअर बाजाराला सांगितलं होतं की, ते आपल्या युजेन युनिटमध्ये १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत. कंपनी चीनमधून आयफोनचं उत्पादन कमी करून ते इतर देशांमध्ये नेत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात अनेक वर्षांपासून ट्रेड वॉर सुरू आहे. त्याचबरोबर मल्टीनॅशनल कंपन्या चायना प्लस वनच्या धोरणावर काम करत आहेत.