India Trade: जागतिक बाजारपेठेत भारताचा प्रभाव झपाट्याने वाढताना दिसतोय. सरकारी आकडेवारीनुसार, भारताची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर पोहोचत असून, अमेरिका मागे पाडत चीन पुन्हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार ठरला आहे. विशेष म्हणजे, चीनमध्ये भारतीय वस्तूंना मोठी मागणी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
चीनमध्ये ‘मेड इन इंडिया’ची जोरदार मागणी
२०२५-२६ या आर्थिक वर्षातील आकडेवारीनुसार, भारत-चीन दरम्यान एकूण १५१.१ अब्ज डॉलरचा व्यापार झाला. १९.४७ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीसह भारताने चीनला निर्यात केलेल्या वस्तूंमध्ये तब्बल ३६.६६% वाढ झाली. यावरून चीनमधील कंपन्या आणि ग्राहक भारतीय उत्पादनांवर अधिक विश्वास दाखवत असल्याचे स्पष्ट होते.
चीनकडून मोठी आयात
भारत सध्या वेगाने औद्योगिक विकासाच्या मार्गावर असल्याने मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि यंत्रसामग्रीची गरज आहे. त्यामुळेच चीनकडून आयात १३१.६३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या आयातीमुळे भारतातील उत्पादन क्षमता वाढत असून, देशांतर्गत उद्योगांना चालना मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही वाढती आयात भारताच्या मजबूत होत असलेल्या अर्थव्यवस्थेचे संकेत आहेत.
अमेरिकेसोबत भारताचा मोठा व्यापार
भारताचा व्यापार केवळ चीनपुरता मर्यादित नाही. अमेरिकेसोबतही भारत मोठ्या नफ्यात आहे. ८७.३ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीसह अमेरिकेसोबत व्यापार नफा ३४.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. विशेषतः भारतीय आयटी सेवा, औषधे आणि इतर उत्पादनांची अमेरिकेत मोठी मागणी आहे.
इतर देशांमध्येही भारताची मजबूत उपस्थिती
वाणिज्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारताचा व्यापार अनेक देशांमध्ये विस्तारत आहे. यामध्ये UAEmirates, जर्मनी, इटली, स्पेन, ब्राझीन, नेपाळ आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. या देशांमध्येही भारतीय उत्पादनांच्या निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या आकडेवारीवरून भारत जागतिक व्यापारात अधिक प्रभावी भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
