India EU Trade Deal Pakista Reaction: भारत आणि यूरोपीय संघ (EU) यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या (FTA) घोषणेनंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या करारामुळे पाकिस्तानच्या निर्यातीवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय आता यूरोपीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी यावर भाष्य केलं. "या करारामुळे पाकिस्तानच्या निर्यातीवर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर आपण ईयूच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत," असंही ते म्हणाले.
पाकिस्तानच्या चिंतेचं मुख्य कारण
भारत आणि यूरोपीय संघाने मंगळवारी या करारावर चर्चा पूर्ण झाल्याची घोषणा केली असून, या वर्षातच त्याची अंमलबजावणी होणार आहे. या करारामुळे भारताला यूरोपीय बाजारपेठेत 'ड्युटी फ्री' (Duty-free) प्रवेश मिळणार आहे. यामुळे बाजारपेठेतील भारताची स्थिती अधिक मजबूत होईल. पाकिस्तानला भीती आहे की, भारताला मिळणाऱ्या या सवलतींमुळे यूरोपीय बाजारपेठेत टिकून राहणं त्यांना कठीण होईल.
विक्रमी उच्चांकावरुन ४४,००० हजारांनी स्वस्त झाली चांदी; सोनंही आपटलं, या भूकंपामागे काय आहे कारण?
निर्यातीवर होणारा मोठा परिणाम
पाकिस्तानच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल २५% निर्यात एकट्या युरोपला केली जाते. यामध्ये सर्वाधिक वाटा कापड उद्योगाचा (Textile Industry) असून तो सुमारे ९ अब्ज डॉलर (८२ हजार कोटी रुपये) इतका आहे. पाकिस्तानला यापूर्वी यूरोपीय संघातून व्यापार सवलती मिळत होत्या, मात्र आता भारताच्या ९१% निर्यातीवर शून्य शुल्क आकारलं जाणार आहे. यामुळे पाकिस्तानची स्पर्धात्मकता भारताच्या तुलनेत कमी होईल. तज्ज्ञांच्या मते, भारताच्या या करारामुळे पाकिस्तानच्या जीडीपीला ०.५% इतका फटका बसू शकतो.
कापड उद्योगावर कोसळणार संकट?
भारताची निर्यात या करारामुळे ३०% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या कापड हब असलेल्या पंजाब आणि सिंध प्रांतातील नोकऱ्यांवर होईल. ऊर्जा खर्चासारख्या समस्यांमुळे येथील परिस्थिती अधिक बिघडू शकते. काही तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानच्या कापड उद्योगाची अवस्था बांगलादेशसारखी होण्याची भीती आहे. यूरोपीय संघ हा पाकिस्तानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असल्यानं, भारतासोबतच्या या डीलमुळे पाकिस्तानच्या ९ अब्ज डॉलरच्या व्यापारावर थेट धोका निर्माण झालाय.
