India Crude Import: इस्रायल आणि इराणमधील युद्ध दिवसेंदिवस भीषण होत आहे. अमेरिकेने इराणी अणुस्थळांवर हल्ला करुन या युद्धाची तीव्रता आणखी वाढवली आहे. यामुळे इराण सतत होर्मुझची सामुद्रधुनी(Strait Of Hormuz) बंद करण्याची धमकी देत आहे. या पार्श्वभूमीवर, भारताने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताने मध्य पूर्वेतील पुरवठादारांऐवजी रशिया आणि अमेरिकेतून जास्त तेल आयात करणे सुरू केले आहे.
जूनमध्ये रशियाकडून तेल आयात २ वर्षांच्या उच्चांकावर
तुम्ही आकडेवारी पाहिली तर, जूनमध्ये रशियाकडून भारताची तेल आयात दोन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, जागतिक व्यापार विश्लेषक फर्म केप्लरच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये भारताने रशिया आणि अमेरिकेतून तेल आयात प्रचंड वाढवली आहे. ही पारंपारिक मध्य पूर्वेतील पुरवठादारांच्या एकूण खरेदीपेक्षा जास्त आहे. जर आपण कंपनीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, भारतीय रिफायनर्स जूनमध्ये दररोज २-२.२ दशलक्ष बॅरल रशियन कच्चे तेल आयात करत आहेत.
रशियाकडून भारताची तेल आयात ही इराक, सौदी अरेबिया, युएई आणि कुवेत येथून आयात होणाऱ्या कच्च्या तेलापेक्षाही जास्त आहे. ही जून महिन्यात सुमारे 2 दशलक्ष बॅरल प्रति दिन (बॅरल प्रति दिन) असल्याचा अंदाज आहे. यापूर्वी, मे 2025 मध्ये रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात 1.96 दशलक्ष बॅरल प्रति दिन होती.
अमेरिकेतून कच्च्या तेलाची आयात वाढली
अमेरिकेतून कच्च्या तेलाच्या आयातीबद्दल बोलायचे झाले तर, जून महिन्यातही वाढून 439,000 बॅरल प्रति दिन झाली आहे. तर, मे महिन्यात ही आयात 280,000 बॅरल प्रति दिन होती. केप्लरचे मुख्य संशोधन विश्लेषक सुमित रिटोलिया यांच्या मते, इस्रायल-इराण संघर्षामुळे आतापर्यंत पुरवठ्यावर परिणाम झाला नसला तरी, जहाजांच्या हालचालींवरुन असे सूचित होते की, येत्या काळात मध्य पूर्वेतून कच्च्या तेलाची वाहतूक कमी होईल. जहाज मालक आखातात रिकामे टँकर (बॅलेस्टर) पाठवण्यास कचरत आहेत. अशा जहाजांची संख्या ६९ वरून फक्त ४० वर आली आहे.
संघर्ष आणखी वाढला तर भारत काय करेल?
अहवालानुसार, या महिन्याच्या १ ते १९ जून दरम्यान, रशियन शिपमेंटने भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी ३५% पेक्षा जास्त कव्हर केले आहे. रिटोलियाने म्हटले आहे की, जर इराणी अणुस्थळांवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संघर्ष आणखी वाढला किंवा त्यात काही अल्पकालीन व्यत्यय आला, तर रशियन आयात आणखी वाढेल. जास्त मालवाहतूक खर्च असूनही भारत अमेरिका, नायजेरिया, अंगोला आणि ब्राझीलकडे अधिक वळू शकतो.
होर्मुझ भारतासाठी का महत्त्वाचे आहे?
अहवालांनुसार, जगातील कच्च्या तेलाच्या व्यवसायापैकी २६ टक्के व्यवसाय या मार्गाने केला जातो. तसेच, जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार असलेला भारत, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुमारे ४०% कच्चे तेल आणि वायू आयात करतो. हा एक प्रमुख तेल मार्ग आहे. परंतु इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर हा मार्ग धोक्यात आल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत, भारताने सावधगीरीचे पाऊल उचलले आहे.