Iran War : मध्यपूर्वेतील इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचा थेट तडाखा भारतीय अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होणारे अवमूल्यन या दुहेरी संकटामुळे भारतावर गेल्या अवघ्या चार दिवसांत सुमारे २,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडला आहे. आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासाठी हे युद्ध आगामी काळात मोठे आव्हान ठरणार आहे.
कच्च्या तेलामुळे ४ दिवसांत १,८२० कोटींचे नुकसान
भारत आपल्या गरजेच्या पूर्ततेसाठी दररोज सुमारे ५० लाख (५ कोटी) बॅरल कच्चे तेल आयात करतो. युद्धाच्या भीतीमुळे तेलाच्या किमतीत प्रति बॅरल सरासरी १० डॉलरची वाढ झाली आहे.
रुपयाच्या घसरणीचा 'दुहेरी' मार
केवळ तेल महागले नाही, तर रुपयाही कमकुवत झाला आहे. भारताचे वार्षिक तेल आयात बिल सुमारे १६० अब्ज डॉलर आहे. जर डॉलरच्या तुलनेत रुपया १ रुपयाने कमकुवत झाला, तर भारतावर वार्षिक १६,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडतो. ४ दिवसांच्या प्रमाणात विचार केल्यास, दररोज ४४ कोटी यानुसार चार दिवसांत सुमारे १७५ ते १८० कोटी रुपयांचा फटका रुपयाच्या घसरणीमुळे बसला आहे.
पुरवठा साखळी धोक्यात
जेएनयूचे निवृत्त प्राध्यापक शिवाजी सरकार यांच्या मते, इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष भारतासारख्या आयात-प्रधान देशांसाठी धोक्याची घंटा आहे. "समुद्री आणि हवाई मार्गावरील अनिश्चिततेमुळे मालवाहू जहाजांची ये-जा विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम केवळ आयातीवरच नाही, तर भारताच्या निर्यातीवरही होऊ शकतो."
वाचा - एका लाखाचे झाले ३ कोटी! 'या' मल्टिप्लेक्स शेअरने ५ वर्षांत दिला ३१,०००% परतावा; तुम्ही घेतलाय का?
भारतापुढील मोठी आव्हाने
- महागाई : इंधन महागल्याने वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती आहे.
- वित्तीय व्यवस्थापन : सरकारला वाढीव आयात बिलामुळे वित्तीय तुटीचे गणित सांभाळताना कसरत करावी लागेल.
- पर्यायी मार्ग : संघर्ष लांबल्यास भारताला तातडीने पर्यायी पुरवठा स्त्रोत आणि 'स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह'चा वापर करावा लागेल.
