Israel Iran Conflict: इस्रायलनं इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर, दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचला आहे. यानंतर, इराणने प्रत्युत्तर देत इस्रायलवर ड्रोन हल्ले केले. दरम्यान, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. हा तणाव आणखी वाढला तरच भारताचं अधिक नुकसान होऊ शकते. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या तणावामुळे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती वाढू शकतात, अशी कबुली या अधिकाऱ्याने दिली. शेअर बाजारातही चढउतार होऊ शकतात. रुपयाचे मूल्यही घसरण्याची शक्यता आहे. जहाजानं माल पाठविण्याचा खर्चही वाढू शकतो. त्याचा भारतावर काय परिणाम होईल हे सांगणं कठीण आहे, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. अर्थ मंत्रालय आणि इतर सरकारी संस्था बाजारावर लक्ष ठेवून आहेत. बाजारात काय चालले आहे, हे ते पाहतील, असंही त्यांनी सांगितलं.
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
किंमतींवर किती परिणाम होईल?
भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यामुळे भारत अशा कोणत्याही समस्येला सहज सामोरे जाऊ शकतो. भारताला फारसं नुकसान होणार नाही. या लढाईचा परिणाम इतर वस्तूंच्या किमतींवर फार काळ टिकणार नाही, असंही या अधिकाऱ्यानं नमूद केलं.
बाजारात घसरण
भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी घसरण झाली. कारण जगभरातील बाजारपेठांमध्येही घसरण दिसून येत होती. इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे गुंतवणूकदार घाबरले होते. त्यामुळे त्यांनी आपले पैसे काढून घेतले. सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये ०.७ टक्क्यांची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमकुवत झाला आहे. रुपया ०.६ टक्क्यांनी घसरून ८६.०९ वर आला. कारण डॉलर मजबूत होत होता. लोक आपले पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवत होते.
पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता
इस्रायलच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाचे दर १२ टक्क्यांनी वाढून ७८.५ डॉलर प्रति बॅरल झाले. पण नंतर भाव कमी झाले आणि ७५ डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले. कारण इस्रायलनं इराणच्या कच्च्या तेलाच्या तळांवर हल्ला केला नसल्याची बातमी आली होती. त्यानं केवळ इराणच्या आण्विक प्रकल्पांवर हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराण होर्मुज हा मार्ग बंद करू शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे. हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे ज्यातून जगातील सुमारे २०% कच्चं तेल जातं. इराणनं तसे केल्यास माल वाहून नेण्याचा आणि जहाजाद्वारे त्यांचा विमा उतरवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्याचा परिणाम भारतातही दिसू शकतो. यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात. तसंच इतर देशांतून भारतात येणाऱ्या इतर वस्तूंच्या किमतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.