Google India Investmet: गुगलभारतात आपला पाहिला आणि देशाच्या डिजिटल इतिहासातील सर्वात मोठा गुंतवणूक प्रकल्प सुरू करणार आहे. कंपनी १० अब्ज डॉलर्स (सुमारे ८८,७३० कोटी रुपये) खर्च करून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे १ गिगावॉट क्षमतेचा एक विशाल डेटा सेंटर क्लस्टर (Data Center Cluster) उभारणार आहे. हा प्रकल्प आशियातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प असेल आणि यातून भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
गुगल आणि त्याच्या उपकंपन्या सध्या ११ देशांमध्ये - अमेरिका, तैवान, जपान, सिंगापूर, आयर्लंड, नेदरलँड्स, डेन्मार्क, फिनलँड, जर्मनी, बेल्जियम आणि चिली येथे २९ ठिकाणी डेटा सेंटर्स चालवतात.
प्रकल्पाचं स्वरूप आणि ठिकाण
द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, हा डेटा सेंटर क्लस्टर विशाखापट्टणम जिल्ह्यातील अडविवाराम आणि तारलुवाडा गावं, तसंच शेजारील अनाकापल्ली जिल्ह्यातील रामबिल्ली गावात तीन वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये उभारला जाईल.
यासाठी तीन उच्च-क्षमतेच्या सबमरीन केबल्स बसवल्या जातील, ज्यासाठी विशेष केबल लँडिंग स्टेशन आणि मेट्रो फायबर लाईन्ससह अॅडव्हान्स्ड दूरसंचार पायाभूत सुविधा विकसित केली जाईल. राज्य सरकारचं लक्ष्य विशाखापट्टणममध्ये मुंबईपेक्षा दुप्पट सबमरीन केबल नेटवर्क तयार करण्याचे आहे.
भागीदारी आणि डेडलाईन
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी डिसेंबर २०२४ मध्येच गुगलसोबत एका एमओयूवर स्वाक्षरी केली. या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे आणि १४ ऑक्टोबर रोजी गुगलची टीम आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री नारा लोकेश यांच्यात यावर औपचारिक स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. हे डेटा सेंटर क्लस्टर जुलै २०२८ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. तथापि, गुगलनं यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही.
भारताच्या डिजिटल भविष्यावर परिणाम
हे डेटा सेंटर क्लस्टर भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय AI इन्फ्रास्ट्रक्चर हबचं केंद्र बनेल. यामुळे आंध्र प्रदेश आणि संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि अॅडव्हान्स्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट कार्यांना गती मिळेल. ही गुंतवणूक देशातील AI, क्लाउड कंप्युटिंग आणि डेटा प्रोसेसिंगची मागणी पूर्ण करण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.