Home Loan : गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात १.२५ टक्क्यांची कपाती केल्यामुळे बँकांनी होम लोनचे दर कमी केले आहेत. यामुळे घर खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र, करोनानंतर मोठ्या शहरांमधील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत 'स्वतःचे घर' घेण्याचे स्वप्न पूर्ण करावे की 'भाड्याच्या घरात' राहून आर्थिक स्वातंत्र्य जपावे, असा पेच अनेकांसमोर आहे.
स्वतःच्या घराचे फायदे
होम लोन घेऊन घर खरेदी करणे हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक उत्तम मार्ग मानला जातो. १५-२० वर्षांच्या ईएमआय नंतर घर पूर्णपणे तुमच्या मालकीचे होते. घर ही एक महत्त्वाची मालमत्ता असून भविष्यात तिच्या किमती वाढतच राहतात. जुन्या कर रचनेनुसार गृहकर्जाच्या मुद्दल आणि व्याजावर कर सवलतीचा फायदा घेता येतो. स्वतःच्या घरात राहिल्यामुळे वारंवार घर बदलण्याचे टेन्शन नसते आणि आपण आपल्या आवडीनुसार बदल करू शकतो.
भाड्याच्या घराचे फायदे
अनेक लोकांसाठी भाड्याचे घर अधिक सोयीचे ठरू शकते. भाड्याने राहिल्यास दीर्घकालीन ईएमआयची कोणतीही जबाबदारी नसते. तसेच घराच्या देखभालीचा खर्च घरमालकाला करावा लागतो. ज्यांची नोकरी बदलीची आहे, त्यांच्यासाठी भाड्याचे घर हा सर्वात चांगला पर्याय आहे. नवीन शहरात घर शोधणे सोपे जाते. ईएमआयच्या तुलनेत घरभाडे कमी असल्यास, उरलेले पैसे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवून मोठी संपत्ती निर्माण करता येते.
घर घेण्यापूर्वी 'हे' गणित नक्की पाहा!
तज्ज्ञांच्या मते, सध्या घरांच्या किमती ज्या वेगाने वाढल्या आहेत, त्या तुलनेत भाडे वाढलेले नाही. अनेकदा घराचा ईएमआय हा त्या घरापासून मिळणाऱ्या भाड्यापेक्षा खूप जास्त असतो. अशा वेळी तुम्हाला स्वतःच्या खिशातून मोठी रक्कम भरावी लागते. जर तुम्ही एका शहरात घर घेऊन दुसऱ्या शहरात नोकरी करत असाल, तर तुम्हाला ईएमआय आणि भाडे असे दोन्ही खर्च सोसावे लागतात, ज्यामुळे आर्थिक ओढाताण होऊ शकते.
वाचा - स्विगीचे १० मिनिटांत डिलिव्हरी 'अॅप' बंद! झटपट फूड डिलिव्हरीचा प्रयोग फसला; कर्मचाऱ्यांचे काय होणार?
४० नंतर गृहकर्ज घेताना सावध राहा!
जर तुमचे वय ३० वर्षे असेल आणि नोकरी स्थिर असेल, तर १५ वर्षांचे गृहकर्ज घेणे सोयीचे आहे. वयाच्या ४५ व्या वर्षापर्यंत तुम्ही कर्जमुक्त होऊन आर्थिक स्थैर्य मिळवू शकता. या वयात मुलांचे शिक्षण, पालकांचे आरोग्य आणि सेवानिवृत्तीचे नियोजन यांसारख्या मोठ्या जबाबदाऱ्या असतात. ५० व्या वर्षी गृहकर्ज घेतल्यास निवृत्तीनंतरही ईएमआय भरण्याचे टेन्शन राहू शकते. त्यामुळे ४० वयानंतर गृहकर्ज घेताना आर्थिक स्थितीचा सखोल विचार करणे गरजेचे आहे.
