Tina and Anil Ambani ED Summon : स्टेट बँक ऑफ इंडिया बँक फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आपला फास अधिक घट्ट केला आहे. उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांना चौकशीसाठी ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. त्यानुसार, टीना अंबानी यांना १७ फेब्रुवारी रोजी, तर अनिल अंबानी यांना १८ फेब्रुवारी रोजी तपास यंत्रणेसमोर हजर राहावे लागणार आहे. यापूर्वी ९ फेब्रुवारी रोजी टीना अंबानी चौकशीला गैरहजर राहिल्याने हे नवीन समन्स धाडण्यात आले आहेत.
१२००० कोटींची मालमत्ता जप्त, ४६ ठिकाणी छापेमारी
गेल्या वर्षी ऑगस्टपासून ईडीने अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या कंपन्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, ईडीने आतापर्यंत १२०१२.४५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. एकूण २०४ मालमत्तांचा यात समावेश आहे. ४६ ठिकाणी झडती घेण्यात आली असून १३ बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
तपासासाठी 'SIT'ची स्थापना
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एका स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सहा अधिकाऱ्यांचे हे पथक या तिन्ही प्रकरणांवर देखरेख ठेवणार आहे. दरम्यान, २९ जानेवारी रोजी तपास यंत्रणेने रिलायन्स कम्युनिकेशन्सचे माजी संचालक पुनीत गर्ग यांना ४०,००० कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात आधीच अटक केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे कडक निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही तपास यंत्रणांना (CBI आणि ED) या प्रकरणाचा तपास स्वतंत्र, निष्पक्ष आणि जलद गतीने करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील चार आठवड्यांत तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अनिल अंबानी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला खात्री दिली की, तपास पूर्ण होईपर्यंत त्यांचे पक्षकार देश सोडून जाणार नाहीत.
वाचा - सामान्यांचं वार्षिक पॅकेज अन् सोनू सूदच्या एका महिन्याचं भाडं सारखंच! HDFC बँकेसोबत झाला मोठा करार
अंबानी समूहाचे स्पष्टीकरण
दुसरीकडे, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने एक प्रसिद्धीपत्रक काढून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "अनिल अंबानी हे गेल्या साडेतीन वर्षांपासून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या संचालक मंडळावर नाहीत. कंपनी ऊर्जा, रस्ते, मेट्रो आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रांत महत्त्वाचे प्रकल्प राबवत आहे," असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
