तुमचा पगार चांगला आहे, नोकरी कायमस्वरूपी आहे आणि दरमहा खात्यात मोठी रक्कम जमा होतेय. अशा स्थितीत आपण गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्जासाठी पात्र आहोत, असा विश्वास वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, अनेकदा पगार भक्कम असूनही बँका कर्ज अर्ज फेटाळून लावतात. असे का होते? कारण, बँक तुमचा पगार नाही, तर तुमच्या खर्चाची पद्धत आणि 'सिबिल' स्कोअर तपासत असते. याबाबत आपण आज जाणून घेऊ या...
हातात उरणारी रक्कम महत्त्वाची का असते?
बँक तुमचा एकूण पगार किती आहे, यापेक्षा सर्व खर्च वजा जाता तुमच्या हातात किती पैसे उरतात, हे पाहते. तुमचे आधीच सुरू असलेले गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, विम्याचे हप्ते यात जर पगाराचा मोठा हिस्सा जात असेल, तर नवीन कर्जाचा हप्ता भरण्याची तुमची क्षमता कमी आहे, असे बँक मानते.
क्रेडिट कार्डचा अतिवापर
तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरत आहात. मात्र, तुम्ही दरमहा तुमच्या मर्यादेच्या (लिमिट) ८०-९० टक्के वापर करीत असाल, तर तुम्ही 'क्रेडिट हंग्री' आहात, असा संदेश जातो. कर्जावर जास्त अवलंबून आहात, असे बँकेला वाटल्यास अर्ज नाकारला जातो. हप्ता चुकला असेल तरी फटका बसतो.
वारंवार नोकरी बदलणे
तुमचा पगार वाढत असला तरी, तुम्ही वारंवार नोकऱ्या बदलत असाल, तर बँक तुम्हाला 'अनस्टेबल' मानते. कर्जाचे हप्ते दीर्घकाळ चालणारे असतात, त्यामुळे उत्पन्नात सातत्य असणे महत्त्वाचे असते. तुम्ही 'जामीनदार' असाल आणि त्या व्यक्तीने हप्ते थकवले असतील, तरी फटका बसतो.
एकाच वेळी अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज करणे
कर्ज नाकारले गेल्यावर लगेच दुसऱ्या बँकेत अर्ज करण्याची चूक करू नका. तुम्ही जितक्या वेळा कर्जासाठी चौकशी करता, तितक्या वेळा तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर त्याची नोंद होते. एकाच वेळी अनेक बँकांकडे धाव घेतल्यास तुम्ही आर्थिक संकटात आहात, असा समज होतो.
