chandrababu naidu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे महत्त्वाचे सहयोगी आहेत. दोन्ही नेत्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जातोय. काही दिवसांपूर्वीच नितीशकुमार यांची जातनिहाय जनगणनेची मागणी पूर्ण झाली. आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारकडे आणखी एक मोठी मागणी केली आहे, ती म्हणजे ५०० रुपये आणि त्यावरील सर्व मोठ्या नोटांवर बंदी घालण्याची!
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 'डिजिटल चलन' महत्त्वाचे!
चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले की, अशा पावलामुळे देशातील भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येईल. वायएसआर कडप्पा जिल्ह्यात तेलुगू देसम पक्षाच्या (TDP) वार्षिक 'महानडू' सभेत पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना नायडू यांनी ५००, १००० आणि २००० रुपयांसारख्या उच्च मूल्याच्या चलनी नोटा रद्द करण्याचे आवाहन केले. तसेच, त्यांनी डिजिटल पेमेंटला अधिक चालना देण्यावर भर दिला.
'डिजिटल चलनाचा प्रचार करा', नायडूंचा पंतप्रधानांना सल्ला
मुख्यमंत्री नायडू म्हणाले, "जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिजिटल चलनाचा अहवाल दिला, तेव्हा मी त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली होती की, ५००, १००० आणि २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्याची गरज आहे. डिजिटल चलनाचा प्रचार करा. मग, जर काही भ्रष्टाचार झाला तर आपण ते सहजपणे शोधू शकतो. मी त्यांना हेच सुचवतो."
याच प्रसंगी, नायडू यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला ही शिफारस लवकरात लवकर लागू करण्याची विनंती केली. ते म्हणाले की, जग आता वेगाने डिजिटल चलनाकडे वाटचाल करत आहे.
QR कोडद्वारे देणगी, नोटांची गरज नाही
चंद्राबाबू नायडू यांनी कार्यकर्त्यांना उदाहरण देऊन सांगितले, "आज मी या मेळाव्याला पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की, आज डिजिटल चलनाचा युग आहे. जर एखाद्याला पक्षाच्या उपक्रमांसाठी देणगी द्यायची असेल, तर आपल्याला यादी पहावी लागत होती. परंतु, आता कार्यकर्ते आणि सामान्य जनता फक्त QR कोडद्वारे देणगी देऊ शकतात. त्यामुळे ५००, १००० आणि २००० रुपयांच्या नोटा वाटण्याची गरजच नाही."
वाचा - तुमची RC हरवलीये? काळजी करू नका! आता घरबसल्या डाऊनलोड करा तुमचं वाहन नोंदणी प्रमाणपत्र
नायडू यांनी आपल्या या प्रस्तावाला जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना, उपस्थित समर्थकांना मोठ्या नोटा रद्द करण्याच्या समर्थनार्थ हात वर करून टाळ्या वाजवण्याची विनंती केली, ज्याला कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. आता मोदी सरकार या मागणीवर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.