Narayana Murthy on AI : आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आयटी क्षेत्रासह इतर क्षेत्रांतील नोकऱ्यांवर गदा येईल, अशी भीती जगभरात व्यक्त केली जात आहे. मात्र, इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी तरुणांना एआयला घाबरण्याची गरज नसल्याचा सल्ला दिला आहे. "एआय हे स्मार्ट आणि कष्टाळू लोकांसाठी धोक्याचे नसून, ते प्रगतीचे साधन ठरेल," असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
उत्पादकता आणि गुणवत्तेत होईल वाढ
नारायणमूर्ती यांनी आपल्या अनुभवातून एआयच्या फायद्यांवर प्रकाश टाकला. जनरेटिव्ह एआयच्या वापरामुळे कामाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढण्यास मदत होईल. तरुणांनी या तंत्रज्ञानामुळे चिंता करण्याची गरज नाही, तर ते शिकण्यावर भर दिला पाहिजे. आपल्या दैनंदिन कामकाजात एआयचा वापर करून नवीन कल्पना आणि शिस्त लवकर आत्मसात करता येईल, असे मूर्ती यांनी म्हटले आहे.
'शिकण्याची क्षमता' हाच यशाचा मंत्र
नारायणमूर्ती यांनी यापूर्वीही तंत्रज्ञानातील बदलांबाबत आपले मत मांडले आहे. त्यांच्या मते, जग वेगाने बदलत असले तरी, 'नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता' हीच गोष्ट शाश्वत राहते. कोणत्याही प्रोफेशनलच्या यशामध्ये त्याच्या शिकण्याच्या वृत्तीचा मोठा वाटा असतो. एआय हे मानवी बुद्धिमत्तेला पर्याय नसून, ते मानवाला अधिक सक्षम बनवणारे साधन आहे.
वाचा - म्युच्युअल फंड क्षेत्रात मोठे फेरबदल! सेबीकडून 'या' स्कीम्स कायमच्या बंद; तुमच्या पैशांचे काय होईल?
एआय शाप की वरदान?
तज्ज्ञांच्या मते, एआय कामाच्या पद्धतीत मोठी क्रांती घडवून आणत आहे. जे काम पूर्ण करण्यासाठी माणसाला अनेक दिवस लागतात, ते एआय अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करू शकते. ज्यांच्याकडे एआय हाताळण्याचे कौशल्य आहे, अशा प्रोफेशनलची बाजारात मोठी मागणी आहे. अलीकडेच दिल्लीत झालेल्या 'एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एआयवर सर्वांचा हक्क असावा आणि त्याचा योग्य वापर व्हावा, यावर जोर दिला आहे.
