Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला हाहाकार आज अधिकच तीव्र झाला. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेला प्रचंड भडका आणि पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय बाजार 'तांत्रिक करेक्शन'च्या विळख्यात सापडला आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्सने २३०० अंकांची गटांगळी खाल्ली, तर निफ्टीने ५ जानेवारीच्या आपल्या विक्रमी उच्चांकावरून (२६,३७३) १० टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांची चिंता वाढत चालली आहे.
कच्च्या तेलाचा 'मोठा' धक्का
सोमवारी कच्च्या तेलाचे दर थेट २६ टक्क्यांनी उसळून ११७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. २०१४ नंतरची ही मोठी उसळी मानली जात आहे. भारत आपल्या गरजेच्या ८५% तेल आयात करतो, ज्याचा मोठा भाग 'होर्मुजच्या सामुद्रधुनीतून' येतो. सध्या या मार्गावर युद्धाचे सावट असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती आहे.
निफ्टीसाठी २३,५३५ ची पातळी महत्त्वाची
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य मार्केट रणनीतीकार आनंद जेम्स यांच्या मते, निफ्टी जर २३,५३५ च्या खाली गेला, तर ही घसरण अधिक खोल जाऊ शकते. जर २३,५३५ ही पातळी तुटली, तर निफ्टी थेट २२,००० आणि त्यानंतर १९,००० पर्यंत खाली येऊ शकतो. बाजार सावरण्यासाठी निफ्टीला २४,००० च्या वर टिकणे अनिवार्य आहे.
या क्षेत्रांना बसणार सर्वाधिक फटका
- तेलाच्या किमती वाढल्यामुळे कच्च्या मालाचा खर्च वाढणार आहे.
- विमान सेवा : इंधन खर्च वाढल्याने आणि हवाई मार्ग बदलावा लागल्याने नफ्यावर परिणाम होईल.
- पेंट्स, टायर आणि केमिकल्स : या उद्योगांचा कच्चा माल पेट्रोकेमिकल्सवर आधारित असतो.
- ऑईल मार्केटिंग कंपन्या : इंधन विक्रीतून मिळणाऱ्या मार्जिनवर दबाव येईल.
SIP गुंतवणूकदारांनी काय करावे?
बाजार कोसळत असताना एसआयपी गुंतवणूकदारांनी घाबरून गुंतवणूक बंद करू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. व्ही.के. विजयकुमार यांच्या मते, "भू-राजकीय तणावाचा बाजारावर होणारा परिणाम हा तात्पुरता असतो. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या पडझडीचा फायदा घेऊन चांगल्या कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक वाढवावी."
वाचा - युद्धाच्या आगीत बाजार होरपळला! एअरलाईन्स-पेंट्स शेअर्स धडाम; झटक्यात १० लाख कोटी बुडाले
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
