Air India Plane Crash : गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान काही मिनिटांतच कोसळले. या विमानात असलेले २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. यातून एक ब्रिटिश नागरिक चमत्कारीकरित्या बचावला आहे. टाटा ग्रुपने पीडित कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यात विमानाचाही विमा उतरवला होता. अशा परिस्थितीत एअर इंडियाला किती नुकसान भरपाई मिळेल? चला जाणून घेऊ.
हे विमान विमानतळाजवळील मेघनानगर परिसरातील एका वैद्यकीय वसतिगृहाला धडकले, ज्यामुळे वसतिगृहात राहणाऱ्या ५६ जणांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात आतापर्यंत एकूण २९७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, ज्यामुळे हा जगातील सर्वात मोठ्या आणि भयानक विमान अपघातांपैकी एक बनला आहे.
टाटा ग्रुपने जाहीर केली भरपाई
अपघातग्रस्त विमानात १२ भारतीय क्रू मेंबर्स व्यतिरिक्त १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटिश प्रवासी, ७ पोर्तुगीज प्रवासी आणि १ कॅनेडियन प्रवासी होते. एअर इंडियाची मूळ कंपनी असलेल्या टाटा ग्रुपने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. यासोबतच, कंपनीने जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही उचलणार असल्याचे म्हटले आहे. टाटा समूहाने या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
विमानाचा विमा उतरवला होता का?
या अपघातानंतर विमानाच्या विम्याबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. हाउडेन (इंडिया) चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अमित अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, अपघातात विमानाचे झालेले नुकसान विमानाच्या सध्याच्या मूल्यांकनाच्या विमा उतरवणाऱ्या कलमाअंतर्गत समाविष्ट केले जाईल, ज्यात सुटे भाग आणि उपकरणे यांचाही समावेश आहे. एअर इंडियाचे हे 'ड्रीमलायनर' विमान होते, ज्याची किंमत त्याच्या डिझाइन, वय आणि इतर घटकांनुसार २१.१ कोटी ते २८ कोटी डॉलर्स (सुमारे १७०० ते २३०० कोटी रुपये) दरम्यान असू शकते.
अमित अग्रवाल यांनी सांगितले की, अपघातग्रस्त विमान (VT-ABN) हे २०१३ चे मॉडेल होते आणि २०२१ मध्ये त्याचा सुमारे ११.५ कोटी डॉलर्स (सुमारे ९६० कोटी रुपये) चा विमा काढण्यात आला होता. नुकसान आंशिक असो वा पूर्ण, विमान कंपनीने घोषित केलेल्या मूल्याच्या आधारे नुकसान भरून काढले जाईल.
एकच विमा कंपनी जोखीम उचलत नाही
इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया (IBAI) चे अध्यक्ष नरेंद्र भरिंदवाल यांच्या मते, एअर इंडियासारख्या मोठ्या विमान कंपन्यांसाठी विमान विमा कार्यक्रम 'फ्लीट आधारावर' (म्हणजे सर्व विमानांसाठी एकत्र) आयोजित केले जातात. तसेच, हा विमा लंडन आणि न्यू यॉर्कसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुनर्विमा (Reinsurance) केला जातो.
ते पुढे म्हणाले, "कोणतीही एकच विमा कंपनी संपूर्ण जोखीम सहन करत नाही. हे कव्हरेज जगभरातील अनेक पुनर्विमा कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विभागले जाते, ज्यामध्ये प्रत्येक कंपनीचा वाटा लहान (१.५% ते २%) असतो, तर एक प्रमुख पुनर्विमा कंपनी सामान्यतः १०-१५% जोखीम घेते. अशा घटनांचा आर्थिक परिणाम या जागतिक नेटवर्कवर विभागून सामायिक केला जातो." यामुळे मोठ्या नुकसानीचा भार एकाच कंपनीवर येत नाही.
वाचा - अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
या अपघातामुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.