HDFC Bank : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या 'एचडीएफसी'बँकेच्या अध्यक्षांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे शेअर बाजारात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. बँकेत काही अंतर्गत खदखद आहे की काय, या चिंतेने गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता होती. हीच अनिश्चितता दूर करण्यासाठी बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने तातडीने 'इन्व्हेस्टर कॉल' आयोजित करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "बँकेत कोणतीही मोठी गडबड किंवा वाद नाही," असा निर्वाळा देत बोर्डाने गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
केकी मिस्त्री यांचा 'गव्हर्नन्स'वर विश्वास
बँकेचे हंगामी चेअरमन केकी मिस्त्री यांनी या संवादादरम्यान अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, "बँकेच्या कार्यप्रणालीत किंवा कारभारात कोणतीही त्रुटी नाही. ७१ व्या वर्षी मी ही जबाबदारी तेव्हाच स्वीकारली, जेव्हा मला बँकेच्या मूल्यांवर आणि सिस्टिमवर पूर्ण विश्वास होता." एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्यातील ऐतिहासिक विलीनीकरणानंतर बँक अधिक मजबूत झाली असून, व्यवसायाची रणनीती बदललेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजीनाम्याचे गूढ कायम; पण अंतर्गत कलह नाकारला
गुंतवणूकदारांच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न होता की, जर सर्व काही आलबेल आहे, तर चेअरमननी राजीनामा का दिला? यावर बोर्डाने सांगितले की,
राजीनाम्यामध्ये कोणतेही ठोस किंवा गंभीर कारण नमूद केलेले नाही.
बँकेत कोणताही 'पॉवर स्ट्रगल' (अंतर्गत सत्तासंघर्ष) सुरू नाही.
व्यवस्थापनाचे सर्व निर्णय एकमताने घेतले जात आहेत.
सीईओंकडून पारदर्शकतेची ग्वाही
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर जगदीशन यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्याचे आश्वासन दिले. "आम्ही बँकेची प्रतिमा डागाळेल असे कोणतेही कृत्य करणार नाही. व्यवस्थापनाची भूमिका नेहमीच प्रामाणिक आणि पारदर्शक असेल. जर कुठे काही कमतरता आढळली, तर ती तत्काळ सुधारली जाईल," असे जगदीशन यांनी नमूद केले.
वाचा - रांगेत उभे राहण्याचे टेन्शन मिटले! देशात पहिले 'LPG ATM' दाखल; दोन मिनिटांत गॅस सिलेंडर मिळणार
रिझर्व्ह बँकेची भूमिका सकारात्मक
बँकेच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात आरबीआयच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. आरबीआयने केकी मिस्त्री यांच्या तीन महिन्यांच्या नियुक्तीला तातडीने मंजुरी दिली असून, नियामक स्तरावर सध्या कोणतीही मोठी चिंता नसल्याचे संकेत मिळत आहेत. बोर्डाने सीईओ शशिधर जगदीशन आणि डीएमडी कैजाद भरुचा यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
