रात्री शेतावर गेलेल्या शेतकऱ्याची वाघाने केली शिकार
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 5, 2024 12:58 IST2024-12-05T12:55:37+5:302024-12-05T12:58:37+5:30
Bhandara : मोहाडी तालुक्यातील जांब-कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत घडली घटना

A tiger hunted a farmer who went to the field at night
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मोहाडी तालुक्यातील जांब-कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत पिटेसूर गावाजवळील वन परिक्षेत्राच्या राखीव वनात रात्री वाघाने शेतकऱ्याला ठार केले. रात्री ११ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. लक्ष्मण डोमा मोहणकर (५०) असे या शेतकऱ्याचे नाव असून तो पिटेसूर या गावातील रहिवासी आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सूवर्ण नियत क्षेत्र (बिट) क्रमांक ५३ राखीव वनात बुधवार, ४ डिसेंबरच्या रात्री रात्री ८ ते ९ दरम्यान ही घटना घडली.
मृत शेतकरी लक्ष्मण मोहणकर यांचे या परिसरात शेत असून शेततळेही आहे. रात्री तळ्यावर मच्छी पकडण्यासाठी निघाला होता. मात्र उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे गावकऱ्यांनी रात्री ११ वाजता शेताच्या आणि जंगले परिसरात शोध घेतला. यादरम्यान जंगलात त्याचे शरीर अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत पडून असलेले आढळले. डावा पाय मांडीपासून खाल्लेला होता, गुडघ्याखालचा पायाचा भाग मृतदेहापासून काही अंतरावर पडून असलेला आढळला.
गावकऱ्यांनी ही माहिती वन विभागाला दिल्यावर वनविभाागचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी पोहचले. पहाटे ३ वाजता त्याचे प्रेत मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.
मनुष्यहानीची पहिलीच घटना
या परिसरात वाघ असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून होती. मात्र मनुष्यहानीची ही पहिलीच घटना आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागिरकांकडून पुढे येत आहे.