नवीन संचमान्यतेमुळे भंडारा जिल्ह्यातील ३९ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:49 IST2025-05-15T13:48:27+5:302025-05-15T13:49:54+5:30
ग्रामीण शाळांना फटका : तर अनेक शिक्षक होणार अतिरिक्त

39 schools in Bhandara district on verge of closure due to new set of norms
राजू बांते
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : शाळांसाठी नवीन संरचनात्मक बदल करण्यात आले. संचमान्यतेत अन्यायकारक सुधारणा करण्यात आली. मात्र या सदोष संच मान्यतेमुळे गरीब व दुर्गम भागातील शाळांना शिक्षकच मिळणार नाहीत. यातून गरीब मुलांच्या शिक्षणाच्या मुळावर घाव घातला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, २०२४-२५ संचमान्यता सुधारित करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५ मार्च २०२४ रोजी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आदी सर्व शाळांसाठी संच मान्यतेमध्ये सुधारित निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार सर्व शाळांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात संचमान्यता उपलब्ध करून देण्यात आली. ही संच मान्यता ३० सप्टेंबर २०२४ रोजीच्या आधार वैध असणाऱ्या विद्यार्थी संख्येनुसार देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. माध्यमिक शाळांमध्ये दुर्गम डोंगराळ, आदिवासीबहुल भाग, ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, कामगार व झोपडपट्टीत राहणाऱ्या पालकांची मुले मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. या सदोष संचमान्यतेमुळे शाळांना शिक्षकच मिळणार नाहीत, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
सहावी ते आठवी या तीन वर्गातील वीस पटसंख्येला किमान दोन शिक्षक मंजूर करून वीसपेक्षा जास्त विद्यार्थी संख्येला तीन शिक्षकांची पदे मंजूर करावी, अशी मागणी आहे. २२ मे मेपर्यंत संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन २२ मेपर्यंत करण्यात यावे, असे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन काम पूर्ण करण्याचे निर्देश आहेत.
संचमान्यतेत शून्य पदे
नववी व दहावीपैकी एका वर्गाची पटसंख्या २० च्या आत असणाऱ्या शाळांच्या संचमान्यतेत इयत्ता नववी दहावीसाठी शून्य पदे दर्शविण्यात आली आहेत. त्यामुळे त्या शाळांचे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. प्रत्येक वर्गाला १० पटसंख्येला किमान दोन शिक्षक मंजूर करा.
जिल्ह्यातील ३९ शाळांना धोका
भंडारा जिल्ह्यातील इयत्ता सहावी ते आठवीच्या २० पेक्षा पटसंख्या असणाऱ्या शाळांना सर्वाधिक धोका आहे. वीसपेक्षा कमी सहावी ते आठवी वर्गाची पटसंख्या असणाऱ्या शाळा १५ आहेत. तसेच माध्यमिक शाळा २४ असून त्या दोन्ही शाळांची संख्या ३९ होत आहे. अशा ३९ शाळा नवीन संचमान्यतेच्या निकषामुळे कायम बंद पडतील काय, अशी भीती वाटायला लागली आहे.
"ग्रामीण गरीब विद्यार्थ्यांच्या गावातल्या मराठी शाळेतील शिक्षणाची दारे बंद पडतील. गरीब विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन अन्यायकारक संचमान्यता सुधारित करावी."
- राजकुमार बालपांडे, अध्यक्ष, भंडारा जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशन