अहिल्यानगर : जिल्ह्यात गतवर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने नदी, नाल्यांना पूर आले होते. यानंतर जून, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरण प्रकल्प कमी दिवसांत ओव्हरफ्लो झाले होते.
परंतु, यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागले आहे. एप्रिलच्या मध्यापर्यत जिल्ह्याच्या धरणांतील पाणीसाठा ६० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
त्यामुळे प्रशासनासह शेतकऱ्यांना पुढील दोन महिने पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. जिल्ह्यात तीन प्रमुख धरण प्रकल्पांसोबत सहा मध्यम प्रकल्प आहेत.
या प्रकल्पात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला, तरी गेल्या महिनाभरात उन्हाची वाढल्याने धरणातील बाष्पीभवन वाढले आहे. यामुळे पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे.
मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांत १० मार्च रोजी ६६.७२ टक्के पाणी साठा होता. आता १० एप्रिल रोजी ५६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
सध्या (दि. १० एप्रिल) भंडारदरा धरणात ६ हजार २७६ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे. तर मुळा धरणात १४ हजार ७४३ दशलक्ष घनफूट आणि निळवंडे धरणात ५ हजार ५१७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.
तर जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पात सध्या ४५.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हाच पाणीसाठा १० मार्च रोजी ६२.११ टक्के होता.
महिनाभरात मोठ्या प्रकल्पात व मध्यम प्रकल्पात पाणी साठ्यांमध्ये अनुक्रमे १०.७२ टक्के व १६.४१ टक्के कमी झाले आहेत.
धरण प्रकल्पनिहाय पाणीसाठा
भंडारदरा - ५६.८५ टक्के
मुळा - ५६.७० टक्के
निळवंडे - ६६.३१ टक्के
आढळा - ६६.३२ टक्के
मांडओहळ - २२.६१ टक्के
घाटशिळ - ४३.४८ टक्के
सीना - ५९.७१ टक्के
खैरी - ४८.८० टक्के
विसापूर - ३३.२९ टक्के
यंदा सुपर अल निनोचा प्रभाव
◼️ सध्या जिल्ह्यातील कमाल तापमान ३९ सेल्सअस अंशापर्यंत पोहचले आहे.
◼️ पुढे एप्रिल, मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे.
◼️ यामुळे प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन वाढणार आहे.
◼️ हवामान विभागाने यंदा सुपर अल निनोचा प्रभाव राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
◼️ जून महिन्यात मान्सून लांबला, तर पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकतो.
अधिक वाचा: कडक उन्हाळ्यात मातीच्या माठात पाणी थंड होण्याचं नक्की लॉजिक काय? जाणून घ्या सविस्तर
