उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. या उन्हाळ्यात एवढा उकाडा व उष्णता वाढली आहे की, जीव नुसता कासावीस होतो.
या कासावीस झालेल्या जीवाला थोडे 'फ्रिज'मधील थंड पाणी प्याले की किती बरे वाटते. तुम्ही, आम्ही, आपण सारे उन्हाळ्याच्या दिवसात हेच करण्याचा प्रयत्न करत असतो.
उन्हापासून आपली तहान भागवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वापरलेली वस्तू आज कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. कोणती बरं ही वस्तू असेल?
तर ती वस्तू म्हणजे आपला नैसर्गिक 'माठ,' हा माठ म्हणजेच 'आपला इंडियन नैसर्गिक फ्रिज' म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण आपल्या पूर्वजांनी दिलेली अनमोल अशी ही नैसर्गिक देणगी आहे.
सध्या प्लास्टिकचे युग आहे आणि या प्लॅस्टिकच्या युगात पाणीही प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये भरलेले आपण पितो आहोत, कारण जग गतिमान झाले आहे.
या प्लॅस्टिकमुळे प्रदूषण तर होतेच आहे. पण, हे प्लास्टिक आरोग्यालाही धोकादायक आहे याची जाणीव सर्वांमध्ये होणे गरजेचे आहे. माठाचा वापर करून माठातील पाणी पिणे गरजेचे झाले आहे. कारण ते आरोग्यदायी आहे.
नावे अनेक गुणधर्म मात्र एकच
माठाला वेगवेगळे शब्द आहेत. कुणी त्याला माठ, मडके, मटके, मटकी, मातीचे भांडे, रांजण, कुंभ, मातीचा घडा, डेरा अशा विविध नावाने ओळखतात. पण या माठाचे नैसर्गिक गुणधर्म पाहिले तर ते खरोखरच पर्यावरणपूरक असे आहेत.
मातीचा माठ पाणी थंड करण्याचे काम कसे करतो?
◼️ माठ मातीपासून बनलेला असतो. त्याच्या भिंतींमध्ये सूक्ष्म छिद्रे असतात.
◼️ ही छिद्रे डोळ्यांना दिसत नाहीत पण त्यातून हवा आणि पाणी जाऊ शकते.
◼️ हीच रचना थंडावा निर्माण करण्यासाठी महत्वाची असते.
◼️ माठात भरलेले पाणी या सूक्ष्म छिद्रांमधून हळूहळू बाहेर झिरपते.
◼️ बाहेर आलेले पाणी खूप सूक्ष्म थर तयार करते. यामुळे माठाच्या बाहेरील भागावर ओलसरपणा दिसतो.
◼️ बाहेर आलेले पाणी हवेशी संपर्कात येते. उष्ण हवेमुळे ते वाफेत रूपांतरित होते. या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात
◼️ पाणी वाफ बनण्यासाठी ऊर्जा (उष्णता) लागते. ही उष्णता माठातील पाण्यातून आणि माठाच्या भिंतीतून घेतली जाते.
◼️ त्यामुळे आतल्या पाण्याची उष्णता कमी होते. उष्णता बाहेर गेल्यामुळे पाण्याचे तापमान हळूहळू कमी होते.
◼️ हा थंडावा संतुलित असतो. खूप जास्त नाही, खूप कमी नाही. त्यामुळे हे पाणी शरीरासाठी सुरक्षित आणि नैसर्गिक असते.
माठातील पाणी का प्यावे?
◼️ मातीमध्ये पाणी शुद्ध करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात, त्यामुळे पाणी स्वच्छ व शुद्ध राहते.
◼️ उन्हाळ्यात या माठात नैसर्गिकरीत्या पाणी थंड झाल्याने व ते पाणी प्याल्याने चयापचयाची क्रिया सुधारते व शरीराला थंडावा मिळतो.
◼️ म्हणजेच या माठाचे असे अनेक नैसर्गिक गुणधर्म आहेत. पण सध्या सध्या ते कालबाह्य होत चालले आहे.
अधिक वाचा: दहा किलोवॅटपेक्षा अधिक सौर वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना झटका; लागू होणार आता 'हे' चार्जेस
