चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या कुरनूर धरणात सध्या उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी मिसळत आहे.
एकरूख योजनेच्या माध्यमातून येत असलेले हे पाणी सध्या हरणा नदीत खळखळते आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उजनी धरणात अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यांतील काही भागांसाठी ३ टीएमसी पाणी आरक्षित आहे. वर्षातून दोन टप्प्यांमध्ये हे पाणी सोडण्याची प्रक्रिया राबविण्यात येते.
दोन वर्षांपूर्वी एकरूख उपसा सिंचन योजनेची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. यानंतर सातत्याने हे पाणी कुरनूर धरणात सोडण्यात येत आहे.
वास्तविक यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कुरनूर धरण जवळपास दोन महिने ओव्हरफ्लो झाले होते. यानंतरही धरणात ८२२ दशलक्ष घनफुट म्हणजेच १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
मात्र, सद्यःस्थितीत बाष्पीभवन, विविध पाणीपुरवठा योजनेतील पाणीउपसा व शेतीसाठी सुरू असलेल्या पाणी उपशामळे धरणात ९० टक्के म्हणजेच ७५०.६४३ दशलक्ष घनफुट इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
प्राप्त मुबलक पाणीसाठ्यामुळे यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती उद्भवणार नसल्याचे चित्र आहे, पण तरीही पाणीवापर प्रक्रियेचा विचार करता उजनीचे येणारे पाणी हे अक्कलकोट तालुक्यासाठी लाखमोलाचे ठरणार आहे.
सोडलेल्या पाण्यामुळे कॅनॉल शेजारील हरभरा, गहू, ऊस, ज्वारी उत्पादक शेतकरी व स्थानिकांना आधार मिळत आहे.
२८ फेब्रुवारीपर्यंत पाणी सुरू
◼️ ३१ जानेवारीपासून उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
◼️ हे पाणी कारंबा शाखा कालवामार्गे हिप्परग्यातील एकरूख तलाव-हिप्परगा पंप हाऊस ते बोरामणी पंप हाऊस-दर्शनाळ कालव्याद्वारे हरणा नदीतून कुरनूर धरणात येते.
◼️ संबंधित विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे पाणी २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू ठेवण्याची शक्यता आहे.
तीन नगरपालिका, ५२ गावांसाठी कुरनूर धरणावर अवलंबून असलेले शेतकरी, ३ नगरपालिका व ५२ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी संबंधित विभागाला एकरूख योजनेच्या माध्यमातून कुरनूर धरणात पाणी सोडण्यासाठी यापूर्वीच आदेश देण्यात आले आहेत. संबंधित विभागाकडून तशी कार्यवाही देखील सुरू आहे. - सचिन कल्याणशेट्टी, आमदार
अधिक वाचा: १०० वर्षांपूर्वीच्या भंडारदरा धरणाचा इतिहास कसा पोहोचला इंग्लंडच्या राजापर्यंत; वाचा सविस्तर
