सणबूर : मराठवाडी धरणातून गुरुवारी सकाळपासून वांग नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. नदीच्यापाणी पातळीत वाढ होणार आहे.
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणीनुसार पाटबंधारे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला असून, या हंगामातील हे तिसरे आवर्तन आहे.
नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश न करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत.
मराठवाडी धरणाचे बांधकाम ३० वर्षांनंतर पूर्णत्वाकडे आहे. २.७३ टीएमसी क्षमतेच्या धरणात आगामी पावसाळ्यात पूर्ण पाणीसाठा करण्यात येईल, असा अंदाज आहे.
पावसाळ्यात धरणाचे दरवाजे खुले ठेवले होते; मात्र लाभक्षेत्राला आगामी सहा-सात महिने पुरून उरेल एवढा पाणीसाठा धरणात यापूर्वी शिल्लक होता.
सध्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली, त्यानुसार पाटबंधारे विभागाने आजपासून तिसरे आवर्तन सोडण्यात आले.
मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात कराड व पाटण तालुक्यामध्ये धरणातून सोडलेले पाणी अडवायला वांग नदीवर दहा बंधारे बांधलेले आहेत.
गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास धरणातून पाणी सोडायला सुरुवात केली. तत्पूर्वी धरणावरील सायरन वाजवून आजूबाजूच्या गावात नदीपात्रात गेलेल्या नागरिकांना सावध करण्यात आले.
पुढचे काही दिवस धरणातील विसर्ग कायम राहणार असून, नदीच्या पाणीपातळीत त्यामुळे वाढ होणार असल्याने नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
आजच्या घडीला धरणात अतिशय कमी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. या पुढे आतील बाजूच्या गावात जनावरांना पाणी मिळणारच नाही व धरणात फक्त मृत पाणीसाठा शिल्लक राहील, त्यामुळे अजून दोन अडीच महिने पूर्ण उन्हाळ्यात पिण्याच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात यावी, याची काळजी पाटबंधारे विभागाने घेतली पाहिजे. - जगन्नाथ विभुते, विभागीय सदस्य, पुनर्वसन प्राधिकरण समिती
अधिक वाचा: बदललेल्या शक्तीपीठ महामार्गामुळे 'या' ३४ गावांतील जमिनीच्या किमतीत दुपटीने वाढ; एकरी काय दर?
