शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अंजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी अवघ्या २४ तासांत शनिवारी दुपारी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान सोनवद गावापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अंजनी नदीपात्रात आधीपासून ओलावा असल्यामुळे आवर्तनाचे पाणी अपेक्षेपेक्षा जलद गतीने पुढे सरकल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोनवदच्या पुढील गावांनाही या पाण्याचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे
पशुधनाच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागणार
• आवर्तनामुळे जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील जवखेडे बु. व जवखेडे खु. तसेच धरणगाव तालुक्यातील अंजनी व गुजर परिसरातील गावांना ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळाला आहे.
• यासोबतच पशुधनाच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पिण्याच्या पाण्याचे आवर्तन आठवडाभर सुरू
• दरम्यान, पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेले हे आवर्तन आठवडाभर सुरू राहणार असल्याने अंजनी थडी व गुजर थडी परिसरातील गावांची पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भागणार आहे.
• सतखेडा व सोनवद शिवारातील मोठ्या बंधाऱ्यांमध्येही काही प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाल्याने त्याचा लाभ शेतकरी व ग्रामस्थांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
