सूर्याचा पारा दिवसेंदिवस चढत असून उन्हाच्या तीव्र झळांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वाढत्या उन्हामुळे जलसाठे झपाट्याने आटत असून, भंडारा जिल्ह्याच्या चौरास भागाची जीवनवाहिनी समजली जाणारी वैनगंगा नदी आता ठिकठिकाणी कोरडी पडू लागली आहे. नदीच्या पात्रात केवळ पाण्याचे छोटे ओहोळ शिल्लक राहिले असून विस्तीर्ण भागात वाळूचे ढिगारे पसरले आहेत.
ऐरवी दुथडी भरून वाहणाऱ्या वैनगंगेच्या पात्रात आता पाण्याऐवजी कोरडी वाळू आणि दगडगोटे दिसत आहेत. पावसाळ्यात रौद्र रूप धारण करणारी ही नदी मे महिन्याच्या सुरुवातीलाच तळाला गेल्याने परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे. भूजल पातळी खालावल्याने विहिरींनी ही तळ गाठला आहे. नदी कोरडी पडल्याचा सर्वाधिक फायदा रेती उपसा व्यवसायाला होत असल्याचे चित्र आहे.
नदीत पाणी कमी असल्याने पात्रात सहज शिरकाव करता येऊन उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पात्रातील वाळू उपसल्यामुळे नदीची नैसर्गिक पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे. मात्र, नदी आटल्याने उभ्या पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आता बिकट झाला आहे.
मोठ्या जलसंकटाची नांदी
वैनगंगेचे हे कोरडे पात्र केवळ पाणीटंचाईचे संकेत नसून, मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हासाचे जिवंत उदाहरण आहे. नदीपात्रात दिसणारी ही भयानक शांतता येणाऱ्या काळात मोठ्या जलसंकटाची नांदी ठरू शकते. चौरास परिसरातील शेती प्रामुख्याने खासगी सिंचनाबरोबरच वैनगंगेच्या पाण्यावर अवलंबून असते.
हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण
