राज्याचा पारा सर्वत्र ४० अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सततची धावपळ आणि कडक उन्हात केल्या जाणाऱ्या कामामुळे शरीरातील पाणी हळूहळू कमी होत आहे.
या उन्हाचा हृदय व किडनीवरही ताण येत असून, नागरिकांनी आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाण्याची पातळी वेगाने खालावते, ज्यामुळे उष्माघाताचा धोका संभवतो.
बऱ्याचदा चक्कर येणे, गरगरणे असे प्रकार घडतात, तरीही अनेक नागरिक शरीराची योग्य काळजी घेत नाहीत. उन्हात काम करणारे मजूर, रस्त्यावरील विक्रेते आणि प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास होत असतो.
तसेच वाढत्या उष्णतेमुळे हृदयावर ताण येऊन हृदयाविकाराचा झटका येण्याच्या घटनाही आता समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागरिकांनो ही काळजी घ्याच
• दिवसातून किमान साडे तीन लिटर पाणी प्यावे.
• आहारात पालेभाज्यांचा समावेश वाढवावा.
• लिंबू सरबत, ताक, पाणीदार फलांचे सेवन करावे.
• मधूमेह, रक्तदाब कायम नियंत्रणात ठेवावा.
• दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे.
उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन उष्माघाताचा धोका वाढतो. मात्र, या उन्हाचा आता हृदयावर ताण पडून हार्ट अटॅक येण्याच्या घटनाही समोर येत आहेत. या घटना रोखण्यासाठी उन्हात प्रवास करणे टाळावे, ज्येष्ठांनीही उन्हात घराबाहेर पडू नये. कोणताही त्रास झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य ते उपचार घ्यावेत. - डॉ. भूषण पाटील, हृदयरोग तज्ज्ञ, सातारा.
हेही वाचा : गोड पेक्षाही अधिक धोकादायक आहेत 'ही' तुमच्या मधुमेहाची खरी कारणे
