आरोग्य विश्वामध्ये 'साखर' आणि 'मधुमेह' या शब्दांचा वापर आपण दररोज करतो. मात्र, आपल्या स्वयंपाकघरातील साखर आणि डॉक्टरांनी निदान केलेला मधुमेह या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
या दोन्ही संकल्पनांमध्ये फरक आहे व केवळ गोड खाणे हेच मधुमेहाचे कारण नाही, असे हृदयविकार तज्ज्ञांनी म्हटले आहे. जाणून घेऊया या विषयाची आज सविस्तर माहिती.
साखर : शरीराचे अत्यावश्यक इंधन
डॉक्टरांच्या मते, साखर किंवा ग्लुकोज हे शरीरासाठी एखाद्या इंधनाप्रमाणे काम करते. ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे मानवी शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी साखरेची गरज असते.
आपण जे पदार्थ खातो, मग ते चपाती असो, फळे असो किंवा भात, पचनक्रियेनंतर त्याचे रूपांतर साखरेत होते. हीच साखर आपल्याला दिवसभराची कामे करण्यासाठी ताकद प्रदान करते.
मधुमेह होण्याची 'ही' आहेत विविध कारणे
केवळ मिठाई किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानेच मधुमेह होतो, हा एक मोठा सामाजिक गैरसमज आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. यामध्ये प्रामुख्याने अनुवंशिकता, लठ्ठपणा, मानसिक ताणतणाव आणि बिघडलेली जीवनशैली यांचा समावेश होतो.
मात्र, गोड खाण्याचा अप्रत्यक्ष संबंध मधुमेहाशी नक्कीच येतो. जास्त गोड खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते आणि हे वाढलेले वजन शरीराची इन्सुलिनची क्षमता कमी करून मधुमेहाला आमंत्रण देऊ शकते.
जीवनशैली सुधारणे, ताण कमी करणे तज्ज्ञांचा सल्ला
केवळ साखरेला दोष न देता, आपली जीवनशैली सुधारणे, ताण कमी करणे आणि वजनावर नियंत्रण ठेवणे हे मधुमेहापासून वाचण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
साखर ही मुळात वाईट गोष्ट नसून ती शरीराची गरज आहे. साखर ही शरीराला लागणारी ऊर्जा आहे, तर मधुमेह ही त्या ऊर्जेचा वापर शरीर नीट करू न शकल्यामुळे निर्माण झालेली स्थिती आहे.
हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
