कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मंगळवारी पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदी पाणीपातळीत पाच फुटांनी वाढ झाली आहे.
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले असून त्यातून ३४०० क्युसेक आणि पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक असा ५५०० क्युसेकने कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.
वारणा धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
यामुळे नदीकाठच्या लोकांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.तर शिराळा तालुक्यात सर्वाधिक ४६.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर गेल्यानंतर व्यवस्थापनाने सकाळी ११ वाजता सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलून तीन हजार ४०० क्युसेक विसर्ग सुरू केला आहे.
पश्चिमेकडील शिराळा, वाळवा, मिरज तालुक्यांसह वारणा धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. वारणा धरण ८२ टक्क्यांपर्यंत भरले आहे.
कोयना धरणही ७२ टक्के भरले आहे. त्यातच पावसाळ्याचा अजून अडीच महिना शिल्लक आहे. परिणामी वारणा आणि कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून मंगळवारी विसर्ग वाढवला आहे.
कोयनानगरला १०३ मिलिमीटर पाऊस पडला. नवजा येथे १३४ आणि महाबळेश्वरला ९२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.
सकाळच्या सुमारास कोयना धरणात सुमारे १६ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ७५.४८ टीएमसी झाला होता.
यंदा प्रथमच दरवाजे खुले
◼️ यावर्षी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जूनपासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. २ हजार ३३० मिलिमीटर पाऊस पडला.
◼️ तसेच मागील दीड महिन्यात नवजा येथे २ हजार २०२ आणि महाबळेश्वरला २ हजार २१८ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली.
◼️ यामुळे कोयना धरणातील साठा वेगाने वाढला. परिणामी, गतवर्षीपेक्षा यंदा लवकर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
अधिक वाचा: शेत रस्त्यांचे वाद मिटणार; आता रस्त्यांची कायदेशीररीत्या सातबाऱ्यावर 'या' ठिकाणी होणार नोंद