Maharashtra Rain & Heat Wave Update: मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा खाली आला असला तरी राज्यभरातील कमाल तापमान चढेच आहे. तापमानाचा पारा वरचढ राहत असतानाच दुसरीकडे हवामानात आणखी बदल होत आहे. राज्यात ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील व मेघगर्जनेसह पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेने दिलासा दिला असून, गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश नोंदविण्यात आले आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, १३ ते १६ मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
विजांचा कडकडाट होईल आणि वादळी वारे वाहतील. तर १३ आणि १४ मार्च रोजी उत्तर कोकणात काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह #पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. १८ ते २० मार्चदरम्यान परिस्थिती अधिक… pic.twitter.com/yAgtWXQWTE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 13, 2026
दरम्यान, मुंबईच्या हवामानात बऱ्यापैकी फेरबदल नोंदविण्यात येत असून, रात्रीचे हवामानही उष्ण आहे.
१३ ते १७ मार्चपर्यंतच्या पाच दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
१५-१६ मार्च या दोन दिवशी विदर्भ-मराठवाड्यासह धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटी स्वरूपाच्या किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
१४ मार्चपर्यंत अलिबाग, डहाणू, जळगाव, नाशिक, अकोला, अमरावती, बुलढाणा येथे उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती जाणवेल. असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
अधिक वाचा: यंदा ज्वारीच्या भाकरीची चव महागणार; मालदांडी ज्वारीला प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?
