कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर पावसाने रिपरिप सुरू केली. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने पाटबंधारे विभागाने सायंकाळी साडेपाचनंतर राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला आहे.
सध्या प्रति सेंकद २५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने 'भोगावती', 'पंचगंगा' काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
हवामान विभागाने रविवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 'ऑरेंज' अलर्ट दिला होता. मात्र, सकाळपासून उघडीप राहिली, काही काळ कडकडीत ऊनही पडले होते. दुपारनंतर वातावरणात बदल होऊन पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यानंतर एकसारखा पाऊस राहिला.
दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १६.४ मिलिमीटर पाऊस झाला. शाहूवाडी, गगनबावडा, गडहिंग्लज, आजरा, कागल, भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळला.
धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी, दूधगंगा, कासारी, घटप्रभा, तुळशी धरणातून विसर्ग सुरू केला आहे. रविवारी दिवसभर राधानगरी धरणातून प्रति सेंकद १५०० घनफूटचा विसर्ग सुरू होता.
मात्र, वाढलेला पाऊस पाहता त्यामध्ये १ हजार घनफूटने वाढ केली आहे. त्यामुळे 'भोगावती' व पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होणार आहे.
आजपासून यलो अलर्ट
आज, सोमवारपासून दोन दिवस जिल्ह्यासाठी यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हातकणंगलेसह सात तालुक्यांनी सरासरी ओलांडली
जून महिन्यात जोरदार पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या ५ टक्के पाऊस झाला असला तरी निम्म्या महिन्यात हातकणंगले, शिरोळ, करवीर, कागल, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांनी जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे.
अधिक वाचा: बनावट दस्त व कुलमुखत्यारपत्र नोंदणी कायदा बदलणार; काय होणार बदल? वाचा सविस्तर