Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे थंडीचा कडका तर दुपारीच्या वेळी उन्हाचा चटका जाणवतोय. पहाटे वेळी १० अंश सेल्सिअसच्या खाली गेलेले तापमान दिवसा मात्र १६ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढताना दिसत आहे.
राज्यातील अनेक भागात किमान तापमान वाढताना दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून पुण्यातील तापमान १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढत असून राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानाचा (Minimum Temperature) पारा ११ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याची नोंद करण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या ३- ४ दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. त्यानंतर परत एकदा तापमान हळूहळू कमी होईल. तसेच विदर्भात येत्या ४८ तासात तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर २ ते ३ अंशांनी किमान तापमानाचा पारा वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
काय सांगतोय IMD रिपोर्ट ?
सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती उत्तर पाकिस्तानासह पश्चिम राजस्थान परिसरात आहे. पश्चिमी चक्रवाताचा (Western Cyclone) सक्रिय प्रभाव असल्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात येत्या ५ दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय राहणार असून किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. नविन लागवड केलेल्या ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
* ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २०% २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५% ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा हवापालट; कसे असेल आजचे हवामान ते वाचा सविस्तर