मुंबई: हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला असून, सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पाऊस झाला.
अहिल्यानगरसह मराठवाड्यात परभणी, जालना, लातूर, खानदेशात नंदूरबार, नाशिक, पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही पावसाने हजेरी लावली.
अहिल्यानगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा तर जालना जिल्ह्यात दोघांचा असा एकूण ४ जणांचा वीज पहून मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची पीक वाचविण्यासाठी पळापळ झाली.
खानदेशातील धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाल्याने पिकांना मोठा फटका बसला. नाशिक, अहिल्यानगरसह पुणे जिल्ह्यात गारांचा पाऊस झाला. या पावसाने कांदा, गहू अशा पिकांसोबत द्राक्ष, डाळिंबाच्या बागांचे नुकसान झाले.
पुण्यात सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास आभाळ एकदम भरून आले. त्यानंतर लगेच पाऊस सुरू झाला. पिंपरी चिंचवडसह परिसरातही पावसाने गारासह हजेरी लावली.
◼️ कुठे ऑरेंज अलर्ट?
नाशिक, अहिल्यानगर, पुणे, बीड, सोलापूर, सांगली, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, सातारा.
◼️ कुठे यलो अलर्ट?
नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर.
अधिक वाचा: आता लाईट बिल येणार कमी; १ एप्रिलपासून १ ते १०० युनिट वापरासाठी वाचा किती असेल दर?
