Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून ४० अंशांच्या वर तापमानाचा चटका सोसणाऱ्या विदर्भाला अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी, शेतकऱ्यांसमोर मात्र चिंतेचे ढग जमा झाले आहेत. (Maharashtra Weather Update)
नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे २४ तासांत तापमानात तब्बल ४ अंशांची घसरण झाली असून पारा ३६.६ अंशांवर आला आहे. संपूर्ण विदर्भात हीच स्थिती असून तापमान २ ते ६ अंशांनी खाली आले आहे.(Maharashtra Weather Update)
विदर्भात उष्णतेची लाट ओसरली
तापमानात घट झाल्यामुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पारा ४० अंशांच्या खाली स्थिरावला आहे. मंगळवारी ३८.४ अंश सेल्सिअससह अमरावती हे विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले.
त्याखालोखाल वर्धा (३७.५), अकोला (३७.३) आणि ब्रह्मपुरी (३७ अंश) येथे तापमानाची नोंद झाली.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता कायम आहे.
राज्यात ३१ मार्च ते २ एप्रिलपर्यंत अलर्टचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ३० मार्चपासून पावसाचे नवीन सत्र सुरू झाले आहे. आता १ आणि २ एप्रिल रोजी संपूर्ण राज्यासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
'या' जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली आणि अहिल्यानगर.
शेतकऱ्यांनो, पिकांची आणि पशुधनाची काळजी घ्या!
रब्बी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाचे संकट आल्याने कृषी विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पीक सुरक्षा : काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवा. गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या.
विजेपासून बचाव : मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा वीज खांबांजवळ उभे राहू नका.
पशुधन सुरक्षा : आपल्या पाळीव जनावरांना सुरक्षित निवाऱ्यात बांधा आणि विद्युत वाहिन्यांपासून लांब ठेवा.
