Maharashtra Weather Update : राज्यात मार्चच्या अखेरीस हवामानाचा अनिश्चित खेळ सुरूच असून, एका बाजूला कोकणात उष्णतेचा जोर वाढत असताना दुसऱ्या बाजूला राज्याच्या अंतर्गत भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, २३ आणि २४ मार्च रोजी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्ण वातावरणाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे.(Maharashtra Weather Update)
मुंबईत तापमानाचा पारा पुन्हा चढणार
गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना मिळालेला दिलासा आता कमी होण्याची चिन्हे आहेत.
मार्चच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पुन्हा तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३३.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, कुलाबा येथेही तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदले गेले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
पुण्यासह राज्यात पावसाचा 'यलो अलर्ट'
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र वेगळे चित्र दिसत आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत सोमवारी मेघगर्जनेसह पावसासाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
तसेच मंगळवारी पुणे, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ येथेही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अवकाळीचा मराठवाड्यावर मोठा फटका
मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. २५ मार्चपर्यंत या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामानातील बदलाचे कारण काय?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत आहे. सध्या वाऱ्यांची दिशा स्थिर नसल्यामुळे वातावरणात सतत बदल होत आहेत. याशिवाय पश्चिमी झंझावात सक्रिय असल्याने कोकणात आर्द्रता वाढत असून, उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह पावसाचे वातावरण निर्माण होत आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चढ-उतार कायम
हवामानातील हे चढ-उतार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करताना अचानक होणाऱ्या पावसासाठीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात सध्या 'दुहेरी हवामान' अनुभवायला मिळत असून, एका बाजूला उष्णतेचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचे सावट असे चित्र निर्माण झाले आहे.
