Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचं संकट अजूनही कायम असून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.(Maharashtra Weather Update)
गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसून, हवामान विभागाने शुक्रवारी (२० मार्च) देखील राज्यातील अनेक भागांत पावसाचा इशारा दिला आहे. तब्बल १४ जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून ६ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
कोठे बरसणार सरी?
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण-गोवा विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात काही ठिकाणी गारपीट, मेघगर्जना आणि ५० ते ६० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तापमानात चढ-उतार
पुढील २४ तासांत राज्यातील कमाल तापमानात २-३ अंशांची घट होणार असून त्यानंतर पुन्हा ३-५ अंशांनी वाढ होईल.
किमान तापमानातही १-२ अंशांची घट अपेक्षित आहे.
हवामानातील या सततच्या बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शनिवारीही पावसाचा इशारा
अवकाळी पावसाचं हे संकट केवळ शुक्रवारीच नाही, तर शनिवार (२१ मार्च) रोजीही कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतमालाचे नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईत कसे असेल हवामान?
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. मात्र पहाटेच्या सुमारास हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान : ३१°C
किमान तापमान : २२°C
शेतकऱ्यांसाठी सल्ला
अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः काढणीस तयार पिके आणि साठवलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
