Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच हवामानाचा पारा चढू लागला असून राज्यातील अनेक भागांत उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. (Maharashtra Weather Update)
उत्तर आणि दक्षिण भारतात सुरू असलेल्या हवामान बदलांचा परिणाम आता राज्यावरही जाणवत असून कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. (Maharashtra Weather Update)
हवामान तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत उकाडा आणखी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
किनारपट्टी भागात उकाडा अधिक जाणवणार
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील २४ तासांत तापमानात वाढ होणार आहे.
फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच किनारपट्टी भागात कमाल तापमान वाढू लागले असून दमट वातावरणामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे.
पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे पुढील तीन दिवसांत मुंबईचे कमाल तापमान सरासरी ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अचानक उष्णता वाढण्यामागील कारण काय?
दक्षिण भारतातील किनारपट्टी भागावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर हवामान स्वच्छ झाले आणि उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे तापमानात वाढ सुरू झाली आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, येत्या काळात तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गारवा कमी
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांत हवामान सध्या कोरडे आहे. पहाटे तापमान १६ ते १८ अंशांच्या दरम्यान नोंदले जात असले तरी दुपारी तापमान ३२ ते ३४ अंशांपर्यंत वाढत आहे. रात्रीची थंडीही कमी झाली असून दिवस आणि रात्रीतील तापमानातील फरक घटला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा प्रभाव अधिक
विदर्भ आणि मराठवाडा विभागात उष्णतेचा प्रभाव अधिक स्पष्ट झाला आहे. नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया तसेच छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी आणि बीड जिल्ह्यांत दुपारचे तापमान ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे. या भागांत आकाश स्वच्छ असून सध्या पावसाची कोणतीही शक्यता दिसत नाही.
राज्यात कोरडे हवामान कायम
सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान स्वच्छ आणि कोरडे आहे. किनारपट्टी भागात दमट वारे वाहत असल्यामुळे उकाडा अधिक जाणवत आहे, तर अंतर्गत भागात कोरडी उष्ण हवा वाहत आहे.
हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी राज्यातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागरिकांसाठी महत्वाचा सल्ला
* तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारच्या उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि हलक्या कपड्यांचा वापर करावा.
* विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजार असलेल्या व्यक्तींनी उष्णतेपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* तापमान वाढल्यामुळे जमिनीतील ओलावा लवकर कमी होतो. त्यामुळे सकाळी किंवा सायंकाळी सिंचन करणे फायदेशीर ठरेल.
* पिकांच्या मुळाजवळ पेंढा, गवत किंवा प्लास्टिक मल्चिंग केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि उष्णतेचा परिणाम कमी होतो, असा सल्ला देण्यात आला आहे.
