Maharashtra Weather update : राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ५ जिल्ह्यांना आज (९ जुलै) रोजी यलो अलर्ट देण्यात आला असून येत्या २४ तासात हवापालट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Weather Update)
कोकण-घाटमाथ्यावरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. मराठवाड्यातही पुन्हा हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
आज (९ जुलै) मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या वेळी ताशी ३०–४० किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आहे.
बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत पावसाची शक्यता असली तरी सतर्कतेचा इशारा दिला गेलेला नाही. या भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून खरीप हंगामाला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासानंतर मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी होईल. १० जुलैनंतर काही दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे हवामान स्थिती
दक्षिण-पश्चिम बंगाल आणि त्याच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्यापासून ७.६ किमी उंचीवर चक्राकार वारे सक्रिय आहेत. ही प्रणाली झारखंड व छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे. सध्या भटिंडापासून ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत एक लांबट कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे.
याशिवाय अरबी समुद्रावरून दक्षिण गुजरात, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण ओडिशापर्यंत आणखी एक हवामानपट्टा सक्रीय झाला आहे. यामुळे राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात पूर्व विदर्भात पावसाचा जोर चांगलाच जाणवत असून गोंदियातील देवरीत २३० मिमी, अर्जुनी मोरगावात २१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीतही जोरदार पाऊस झाला आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावरील काही भागांत पावसाचा जोर किंचित कमी झाला असला तरी जोरदार सरींमुळे स्थानिक पूरस्थिती उद्भवू शकते.
आज रायगड, पुणे, नाशिकच्या घाटमाथ्यावर, तसेच चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
यलो अलर्ट
कोकण व घाटमाथा: पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.
विदर्भ: नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
रेड अलर्ट
वर्धा जिल्ह्यास हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मागील दोन दिवसापासून देखील अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* सोयाबीन, मूग, उडीद पिकांमधील पाणी निथळून जाईल अशी व्यवस्था ठेवा.
* पेरलेल्या पिकांमध्ये तणनियंत्रणावर भर द्या.