Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड, तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती आणखी चिंताजनक ठरत आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. (Maharashtra Weather Update)
मागील २४ तासांत मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली. लातूरच्या अहमदपूरमध्ये तब्बल १७० मिमी पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.(Maharashtra Weather Update)
राज्यभर पावसाचा जोर
मध्य भारतातून पश्चिमेकडे सरकलेल्या कमी दाब प्रणालीमुळे महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता वाढली आहे. लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, सोलापूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाने दिला अलर्ट
रेड अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा व पुणे घाटमाथा.
ऑरेंज अलर्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा व छत्रपती संभाजीनगर.
यलो अलर्ट : नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, सांगली, सोलापूर, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली.
कमी दाब क्षेत्राची स्थिती
सध्या दक्षिण अंतर्गत ओडिशामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून शनिवारी सकाळी ही प्रणाली गुणापूरपासून ५० किमी ईशान्येला, गोपालपूरपासून ७० किमी पश्चिमेला आणि जगदलपूरपासून २३० किमी पूर्वेला केंद्रित होती. या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
मान्सूनच्या परतीला विलंब
नैऋत्य मोसमी वारे राजस्थान, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमधून माघारले आहेत. गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील काही भागांतूनही परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र, मध्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने मान्सूनच्या परतीला राज्यात विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुढील आठवड्याचा अंदाज
या प्रणालीची तीव्रता हळूहळू कमी होत असली तरी गोव्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. याशिवाय उत्तर अंदमान समुद्रातील वाऱ्यांच्या प्रभावामुळे १ ऑक्टोबर रोजी पुन्हा बंगालच्या उपसागरात नवे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे आहेत.
नागरिकांना इशारा
राज्यातील कोकणपट्टी, पुणे व नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा धोका आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांच्या पुराच्या पाण्यापासून दूर राहावे, धोकादायक ठिकाणी प्रवास टाळावा, तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* शेतात पाणी साचू देऊ नका. नाले, गटारे व पिकांच्या फटींचा निचरा चालू ठेवा.
* कापणीस योग्य असलेली पिके सध्या काढू नका. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच कापणी करा.