Maharashtra Weather Update : राज्यभरात शेतकऱ्यांना रडवत असलेल्या पावसाने विदर्भातही धुमशान घातले आहे. उत्तरेकडून परतीच्या प्रवासाला लागलेला मान्सून विदर्भात पुन्हा सक्रिय झाला आहे. बुधवारपासून सर्व जिल्हे पावसाच्या सावटाखाली आले आहेत. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या अखेरीस राज्यात पुन्हा एकदा पावसाची सक्रियता वाढली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत हलका ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.(Maharashtra Weather Update)
विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.(Maharashtra Weather Update)
हवामानाचा अंदाज काय?
२६ सप्टेंबर (शुक्रवार) : दक्षिण विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस.
२७ सप्टेंबर (शनिवार) : दक्षिण मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज.
२८ सप्टेंबर (रविवार) : कोकण, मध्य महाराष्ट्र, मुंबई महानगरासह विविध भागांत मुसळधार पाऊस. उर्वरित भागांत हलका ते मध्यम पाऊस.
विदर्भात पुन्हा जलधारा
गेल्या दोन दिवसांत विदर्भात पावसाने जोर धरला आहे. गडचिरोलीत गुरुवारी सकाळपर्यंत ६७.८ मि.मी. तर सायंकाळपर्यंत २६ मि.मी. पावसाची नोंद झाली. चंद्रपूरमध्ये सकाळी ३२ व सायंकाळी ३४ मि.मी., गोंदियात ३५ मि.मी. तर भंडारा शहरात २२ मि.मी. पावसाची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रिमझिमसरींसह आकाशात ढगाळ वातावरण दिसले.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
सततच्या पावसामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन व तुरीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.
कापूस : बोंड फुटण्यापूर्वीच पावसामुळे शेंड्यावरील कापूस खराब होण्याचा धोका.
सोयाबीन : शेंगा फुटून दाणे गळण्याचा धोका निर्माण.
तूर : वाढीच्या अवस्थेत पाणी साचल्याने पिकावर नकारात्मक परिणाम.
शेतकऱ्यांनी काढणी केलेले पिक तातडीने सुरक्षित जागी साठवून ठेवावे, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.
प्रशासनाचा इशारा
आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना नदी-नाले व धरणाजवळ सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धरणांचा साठा वाढल्याने अचानक विसर्ग सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मान्सूनचा निरोप लांबणीवर
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून राज्यातून लवकरात लवकर ५ ऑक्टोबरनंतरच माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाचे सावट कायम राहणार आहे.
शेतकरी व नागरिकांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभाग व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* ढगाळ वातावरणामुळे बोंडअळी, पानांवर रोग, कीड वाढू शकते. वेळेवर औषध फवारणी करा.
* शेतात व पिकाभोवती पाण्याचा निचरा करण्याची सोय करा.