Maharashtra Weather Update :राज्यात मान्सूनने(Monsoon) जोर धरला असून, मुंबई, कोकण व पुण्यासह रायगडमध्ये मुसळधार पावसाने(Heavy Rain) हजेरी लावली आहे. अनेक भागांत रस्ते जलमय झाले असून, सिंधुदुर्गात एकजण नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने पुढील पाच दिवसांचा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.राज्यात मान्सूनने (Monsoon) आता खऱ्या अर्थाने जोर धरला आहे. विशेषतः कोकण, मुंबई, पुणे आणि रायगड जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत जोरदार ते मुसळधार पावसाची नोंद झाली.(Maharashtra Weather Update)
कोकणासह विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
पुणे, रायगडमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस
पुणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज(२४ जून) रोजी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यात मागील दोन दिवसांपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत होता, मात्र आज सकाळीपासून पावसाचा जोर अचानक वाढला.
रायगड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून आलेल्या मुसळधार पावसामुळे अलिबाग, मुरूड, पेण, माणगाव, रोहा आदी तालुक्यांतील सखल भागात पाणी साचले आहे. वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
कोकण-विदर्भात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मोसमी पावसाने सक्रियतेने हजेरी लावली आहे. कोकण आणि विदर्भ विभागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मुंबईत अलर्ट कायम
मुंबईत मागील दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर कमी झालेला दिसतो आहे. सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रात अनुक्रमे ६ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र हवामान खात्याने मुंबईसाठीही अलर्ट जारी केला आहे.
सातपुडा, नंदुरबारातही जोरदार पावसाची सुरुवात
नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर डोंगराळ भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
सातपुडा परिसरात पावसामुळे लहान नद्यांना पूर आला असून, काही भागांत नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्गमध्ये युवक नदीत वाहून गेला
मुसळधार पावसाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यात जीवघेणा ठरला. कुडाळ तालुक्यातील माणगाव परिसरात कर्ली नदीवरील पुलावरून जात असताना पाण्याच्या प्रवाहात दुचाकीस्वार वाहून गेला. पुलावरील पाण्याचा अंदाज न घेतल्यामुळे हे दुर्घटनाग्रस्त युवक वाहून गेला असून, त्याच्यासोबत असलेला सहकारी सुदैवाने वाचला. रात्री अंधार असल्याने मदतीसाठी कुणीही प्रतिसाद देऊ शकला नाही. ग्रामस्थांकडून शोधमोहीम सुरु आहे.
सावधान! नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना पाळाव्यात
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या सूचनेनुसार, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, जलाशय, नद्या, ओढे यांपासून दूर राहावे. तसेच घरात सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.
पावसामुळे अनेक भागांत दरड कोसळण्याचा, विद्युत पुरवठा खंडित होण्याचा आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याचा संभव असल्याने यंत्रणांनी सतर्कता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* जास्त पाऊस झाल्यास शेतातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी निचरा व्यवस्था ठेवा, विशेषतः भात, सोयाबीन व मका पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन करा
* बीज साठवणूक योग्य पद्धतीने करा. आर्द्रतेपासून संरक्षण द्या.
* मुसळधार पावसात माती वाहून जाऊ नये म्हणून बांध मजबूत करा.
* हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसासह जोरदार वारे व समुद्र खवळलेला राहील, असा अंदाज दिला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे निर्देश पाळावेत.