कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर काही तालुक्यांतील अपवाद वगळता पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला असला तरी धरणातील विसर्ग कायम आहे.
दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी एक फुटाने कमी झाली असून, अद्याप १९ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३,१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने काहीसी उसंत घेतली आहे. शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, आजरा वगळता इतर ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
रविवारी सकाळी अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पण, त्यानंतर कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यात दिवसभर उघडीप दिली.
धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. तरीही राधानगरीतून प्रतिसेकंद ३,१००, तुळशीतून ३००, वारणातून १,७२०, तर दूधगंगेतून १,६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने तुळशी, भोगावती व पंचगंगा नद्यांची पातळी हळूहळू कमी होत आहे.
आहे. शिवाय चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे सध्या वारणा नदीपात्रात पाण्याची मोठी वाढ झाली आहे, या नदीपात्राचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. शनिवारी सायंकाळी वारणा नदीवरील चिकुर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे.
सध्या वारणा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे, बऱ्याच ठिकाणी पात्राचे पाणी बाहेर पडल्यामुळे शेतात पाणी पसरले आहे. नदीकाठच्या शेतात अद्यापही पाणी असल्यामुळे शेतातील पेरणीची कामे खोळंबली आहेत.
धरणातील पाणीसाठा
धरण - क्षमता (टीएमसी) - साठा
राधानगरी - ८.३४ - ५.१३
तुळशी - ३.४१ - १.९२
वारणा - ३४.३९ - १९.३६
दूधगंगा - २५.३९ - ७.९८
कासारी - २.७७ - १.१६
कडवी - २.५३ - १.२७
कुंभी - २.७१ - १.५३
पाटगाव - ३.७१६ - २.१८
कोयना - १०५.२५ - ३६.५६
धोम - १३.५० - ७.००
कण्हेर - १०.१० - ५.६२
उरमोडी - ९.९६ - ५.४४
तारळी - ५.८५ - २.०७
बलकवडी - ४.०८ - ०.६७
अधिक वाचा: आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील 'हे' कुटुंब चुरमुरे विक्रीतून करते कोटींची उलाढाल; वाचा सविस्तर