गौरव सांगावकर
राधानगरी : येत्या दोन दिवसांत राधानगरी धरणातून १४०० ते १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील काही ठिकाणी बंधाऱ्याचे बरगे नदीतच आहेत. नदीतील पाण्यामुळे अद्याप बरगे काढता आले नाहीत. त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग बंद होता.
येत्या दोन दिवसांत नदीतील बरगे काढून धरणातून विसर्ग करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन असल्याची माहिती राधानगरी धरणाचे शाखा अभियंता समीर निरुखे यांनी दिली.
मागील आठवड्यातच धरणातून विसर्ग करण्याची गरज होती पण, नदीतील बरगे न काढल्याने तसेच मे महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जलसंपदा विभागाचे नियोजन कोलमडले. त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग बंद होता.
जूनच्या पहिल्याच आठवड्यात धरणात ५२ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस सुरू झाला तर संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आतापासूनच धरणातून विसर्ग करणे गरजेचे आहे.
धरण क्षेत्रात १ जून ते आजतागायत ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात करण्यात येणार आहे.
धरणातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये व धरण भरलेली टक्केवारी)
दूधगंगा - ५.३६ - २१%
राधानगरी - ४.४३ - ५२%
तुळशी - १.८८ - ५४%
अधिक वाचा: राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा वाढला का? कमी झाला? जाणून घ्या सविस्तर