टेंभुर्णी: पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने आगामी आषाढी वारी सुखकर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
१५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या पंढरपूर आषाढी वारीवर चंद्रभागेच्या पुराचे सावट निर्माण झाले होते. उजनीतून दौंड येथील विसर्ग वाढल्याने उजनी धरणाचीपाणी पातळी ७७ टक्क्यांवर गेली होती.
शुक्रवारपासून उजनीतून भीमा नदीत १२ टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी ७०.२३ टक्के असून, उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेला विसर्ग १० हजार क्युसेक कमी करण्यात आला आहे.
सध्या ४१ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे, तर दौंड येथून २३ हजार ८६६ क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत आहे. सध्या नरसिंहपूर येथे ६४ हजार २१९ क्युसेक विसर्ग आहे, तर पंढरपूर येथे ४३ हजार ३८१ क्युसेक विसर्ग चंद्रभागा नदीपात्रात आहे.
नीरा खोऱ्यातील वीर धरणातून १८ हजार ३७५ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असून, पुढील तीन दिवस पंढरपूर येथे ५० हजार क्युसेक विसर्ग राहण्याचा अंदाज असून, भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्याने त्यानंतर चंद्रभागा नदीची पाणी पातळी ओसरणार आहे.
खडकवासला, कळमोडी, वडिवले कासारसाई या धरणातील सोडण्यात येणारा विसर्ग घटला आहे. घोड धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.
या ठिकाणी दिवसभरात तुरळक पावसाची नोंद झाली आहे. बंडगार्डन येथील विसर्गात घट होत असून, ९ हजार क्युसेक सुरू असल्याने दौंड येथील विसर्ग घटत चालला आहे. बुधवारी सकाळी २६ हजार ८३६ क्युसेक होता त्यात घट होत चालली आहे.
७० टक्क्यांवर उजनी धरण स्थिर ठेवण्यात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात पूरस्थिती निर्माण होणार याची खबरदारी घेतली जात आहे
धरणात सध्या १०१ टीएमसी पाणीसाठा
उजनी धरणात सध्या एकूण १०१ टीएमसी पाणीसाठा असून, ३७.६२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनीतून मुख्य कालवा ८०० क्युसेक, भीमा-सीना जोड कालव्यातून २०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
अधिक वाचा: आशिया खंडातील सर्वांत मोठा 'हा' उपसासिंचन प्रकल्प ठरतोय शेतीसाठी वरदान; जाणून घ्या सविस्तर