कमी पावसाचा सामना करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध गावांसाठी मृद व जलसंधारण विभागांनी बांधलेल्या तलावांमुळे भूजलपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. या तलावांमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३५ हजार ५५८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले शिवाय विहिरी, बोअरवेल रिचार्ज होण्यास मदत झाल्याचे जिल्हा मृद व जलसंधारण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दुष्काळी मराठवाड्यासाठी मृद व जलसंधारण विभागाला खूप महत्त्व आहे. या विभागाच्या वतीने 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या उद्देशाने मागील काही वर्षात विविध गावांच्या शिवारात १५७२ तलाव उभारण्यात आले. या तलावांमुळे १८४.७८ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. या तलावांची एकूण संकल्पित सिंचन क्षमता ३६ हजार ५५८ हेक्टर आहे.
असे असले तरी यापेक्षा अधिक क्षेत्राला या तलावांचा लाभ होत असल्याचे जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांनी सांगितले. ते म्हणाले की, आमच्या विभागाच्या तलावांतून थेट कालव्याद्वारे शेतीला पाणीपुरवठा करण्यात येत नाही. मात्र, या तलावामुळे भूजल पातळीत वाढ होते. विहिरी, बोअरवेलचे पुनर्भरण होते.
परिणामी, गाते टँकरमुक्त होतात शिवाय पशु आणि पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते. कटके म्हणाले की, शासनाने कोणत्या क्षमतेचे तलाव कोणी उभारावे, याविषयी नियमावली दिली आहे. यानुसार १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे तलाव जि. प. कडून उभारले आतात. तर १०१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेचे तलाव आमच्या विभागामार्फत उभारले जातात.
६०१ हेक्टरपेक्षा अधिक सिंचन क्षमतेचे तलाव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून उभारले जातात. आमच्या १५७२ तलावांची देखभाल-दुरुस्तीही आम्हीच पाहतो. ग्रामीण भागातील गावांना टँकरमुक्त करण्यासाठी आमचे तलाव जणू जादूच करतात. पावसाळ्यात तलाव भरले की, भूजल पातळीत वाढ होत राहते.
