यावर्षी सांगली जिल्ह्याच्या वारणा धरण पाणलोट क्षेत्रात झालेला दमदार पाऊस आणि प्रशासनाचे चोख जलनियोजन यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. धरण परिसरात यंदा एकूण ३,०६१ मिमी पावसाची नोंद झाली असून, पाथरपुंज येथे ७,८६५ मिमी पावसाचा विक्रम नोंदवला गेला आहे.
आगामी 'अल-निनो'च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई भासू नये यासाठी प्रशासनाने ऑगस्ट २०२६ पर्यंतचे नियोजन आत्तापासूनच आखले आहे. गतवर्षीपेक्षा १.६२ टीएमसी जादा पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्या पावसाळ्यात वारणा धरणात एकूण ५५.९९ टीएमसी पाण्याची आवक झाली. २५ जुलै २०२५ रोजी पावसाने रौद्ररूप धारण केले होते, ज्या दिवशी पाथरपुंज येथे २६८ मिमी, तर धरण परिसरात १७२ मिमी पावसाची नोंद झाली. पूर नियंत्रणासाठी प्रशासनाने अत्यंत सतर्कता बाळगत पावसाळ्यात एकूण ३५.३३ टीएमसी पाण्याचा विसर्ग केला.
यामध्ये वीजनिर्मिती केंद्रातून २२.४७ टीएमसी तर दरवाज्यातून १२.८६ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. योग्य नियोजन करून वीजनिर्मिती केंद्रातून जादा पाण्याचा विसर्ग झाल्याने पूरपरिस्थिती नियंत्रणात आली होती. यामुळे नुकसान कमी झाले. यामध्ये सर्वाधिक विसर्गः २० ऑगस्ट २०२६ रोजी ३८ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले होते.
रविवारची स्थिती आणि पाणीसाठा
सध्या वारणा धरणामध्ये १७.८८ टीएमसी (५१.९८%) एकूण पाणीसाठा असून, त्यातील उपयुक्त पाणीसाठा ११ टीएमसी (३९.९७%) इतका आहे.
१६०० क्युसेक विसर्ग
२ मे २०२६ रोजी म्हैसाळ योजनेच्या मागणीमुळे १३८० चा विसर्ग वाढवून १६०० क्युसेक विसर्ग सोडला, त्यापैकी ३८० क्युसेक विसर्ग वारणा डाव्या कालव्यातून व उर्वरित १२२० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडला आहे.
ऑगस्ट अखेरपर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवण्यात येणार असल्याने, शेती आणि उद्योगांसाठी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, जेणेकरून भविष्यात कोणत्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही. - बाबासाहेब पाटील, उपविभागीय अभियंता, वारणा धरण व्यवस्थापन.
हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक
