यंदा लवकर भरलेल्या उजनी धरणाचीपाणी पातळी १०३.३४ टक्के स्थिर असून दौंड येथील पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात दौंड येथील विसर्गात घट झाली होती. सध्या २ हजार २३२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. शनिवारी सकाळी १ हजार ९९१ क्युसेक सुरू होता. गेल्या तीन महिन्यांपासून दौंड येथील विसर्ग सुरू असून ९ ऑगस्ट रोजी उजनी धरण शंभर टक्के भरले होते. विसर्ग घटल्याने आठ दिवसात ३ टक्के वाढ झाली आहे.
सध्या उजनी मुख्य कालवा ३०० क्युसेक, भीमा-सीना जोड कालवा ४०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन १८० क्युसेक तर दहिगाव ८० क्युसेक विसर्ग उजनीतून सोडण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात दौंड येथील विसर्ग घटल्याने भीमा नदी व विद्युत निर्मितीसाठी सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला होता. तर उजनी मुख्य कालव्यातील विसर्गात घट केली आहे.
सध्या उजनी धरणात एकूण ११९.०२ टीएमसी पाणीसाठा असून ५५.३६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. यंदा उजनी धरणातील पाणीसाठा समाधानकारक असून यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्याची चिंता कमी झाली आहे. तसेच सध्या धरणातून नियोजनबद्धरीत्या विविध कालव्यांमार्फत पाणी सोडले जात असून, शेतीसाठी आवश्यक तेवढाच विसर्ग राखण्यात येत आहे.
हेही वाचा : राज्याच्या 'या' कारागृहातील कैद्यांच्या शेती मेहनतीतून ६७ लाखांचे उत्पन्न; वाचा सविस्तर