कोल्हापूर : राज्यातील २१० खासगी व सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असून, गेल्यावर्षीपेक्षा १ कोटी ९१ लाख २० हजार टनाने यंदा गाळप वाढले आहे.
तुलनेत साखर उताऱ्यात किंचतशी वाढ झाली असून, ऊस गाळपात मात्र यंदा सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.
सर्वाधिक १ कोटी ५९ लाख ९३ हजार ७१३ टन गाळप केले आहे. मात्र, साखर उतारा सरासरी ११.२८ टक्के राखत कोल्हापूर जिल्ह्याने साखर उत्पादनात मुसंडी मारली आहे.
राज्यातील १०३ सहकारी व १०७ खासगी साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. नेहमीच ऊस उत्पादनासह साखर उताऱ्यात आघाडी असणारे कोल्हापूर व पुणे जिल्हे यावेळी थोडे मागे पडले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांनी १ कोटी २९ लाख ८७ हजार टनाचे गाळप करून १ कोटी ४६ लाख ४९ हजार ७१० क्विंटल साखर उत्पादित केली आहे.
या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १ कोटी ५९ लाख ९३ हजार ७१३ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.८५ टक्के उतारा राखत १ कोटी ४१ लाख ५९ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
चांगल्या पावसाने सोलापूरचे क्षेत्र वाढले
गेल्यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकांना पोषक पाऊस राहिल्याने ऊस पीक जोमात आले होते. त्यामुळे उत्पादन वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रमुख जिल्ह्यातील ऊस गाळप व साखर उत्पादन
| जिल्हा | कारखाने संख्या | ऊस गाळप (टन) | साखर उतारा (%) | साखर उत्पादन (क्विंटल) |
|---|---|---|---|---|
| सोलापूर | ३७ | १ कोटी ५९ लाख | ८.८५ | १ कोटी ४१ लाख |
| कोल्हापूर | २३ | १ कोटी २९ लाख | ११.२८ | १ कोटी ४६ लाख |
| पुणे | १६ | १ कोटी १६ लाख | ९.८१ | १ कोटी १४ लाख |
| आहिल्यानगर | २२ | १ कोटी १५ लाख | ८.९३ | १ कोटी ०३ लाख |
| सातारा | १७ | १ कोटी ०९ लाख | ९.९६ | १ कोटी ०८ लाख |
| सांगली | १६ | ८० लाख ५८ हजार | १०.६० | ८५ लाख ४१ हजार |
| धाराशिव | १५ | ६२ लाख ११ हजार | ७.९७ | ४९ लाख ४९ हजार |
| नाशिक | ०६ | ९ लाख ५९ हजार | १०.८६ | १० लाख ४१ हजार |
अधिक वाचा: इतर झाडाच्या तुलनेत नारळाच्या झाडावरच का पडते वीज? जाणून घ्या ह्या मागचे लॉजिक
