अजित घस्ते
पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका भारतीय कृषिमाल निर्यातीला बसला आहे.
दुबईतील बाजारपेठ कधी उघडणार, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकरी व व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
कांद्याचे बाजारभाव पडलेत. निर्यातीला ब्रेक लागल्याने व कांद्याला भाव कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्केटयार्ड कांद्याच्या बाजारपेठेवर संमिश्र परिणाम दिसून येत आहे.
याचा थेट फटका निर्यात आणि पर्यायाने स्थानिक दरांवर होत आहे, मार्केट कांदा-बटाटा विभागात कांद्याची नवीन आवक सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी १२ ते १५ रुपये भाव होता. तोच आता ८ ते १० रुपये किलो येऊन ठेपला आहे. यातून लागवडीचा खर्चही निघेना झाला आहे.
मार्केटयार्डातील आवक पुणे मार्केटयार्डात सध्या नवीन आणि जुन्या कांद्याची आवक सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक स्थिर होती.
मात्र, निर्यातीत अडथळे आल्यामुळे कांद्याचा साठा स्थानिक बाजारात वाढला असल्याने पूर्वी १२ ते १५ रुपये किलोचा भाव आता फक्त ८ ते १० रुपयांवर आला आहे.
सध्या साधारण २०० ट्रक मालाची आवक पुणे बाजारात झाली आहे. सध्या चांगल्या दर्जाच्या कांद्याला १२०० ते १५०० प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळत असल्याचे चित्र आहे.
युद्धामुळे निर्यात ठप्प
◼️ अमेरिका व इस्रायल संयुक्त मोहिमेत हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणने कतार, कुवेत, बहरीनवर जोरदार हल्ले केले.
◼️ मुंबई येथील न्हावा शेवा अर्थात जवाहरलाल नेहरू बंदरावर १५० ते २०० कंटेनर अडकून पडलेत. दुबईमार्गे हा माल आखाती देशात जाणार होता.
युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. जर ही परिस्थिती अधिक काळ राहिली, तर कांद्याचे दर स्थानिक बाजारात कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या शेकऱ्यांनाचा किमान खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. - अप्पा कोरपे, कांदा व्यापारी, मार्केटयार्ड
सात एकर जागेत कांदा लागवड करतो. यंदा कांद्याची लागवड व वाहतूक खर्चही निघत नाही. पूर्वीचा भावही मिळत नाही. त्यामुळे संभ्रम अवस्थेत आहे. यातून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. - रामभाऊ जाधव पाडळी, करमळा, सोलापूर, शेतकरी उत्पादक
युद्ध परदेशात होते, पण त्याची झळ राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसते, हे नियोजनाचे अपयश आहे. निर्यात थांबली, तर तो देशांतर्गत साठवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देणे सरकारचे कर्तव्य आहे. निर्यातीवर बंदी दरम्यान शेतकऱ्यांना वाहतूक खर्च द्यावा, तसेच अतिरिक्त निर्यात शुल्क लावू नये. - डॉ. बुधाजीराव मुळीक, कृषितज्ज्ञ
