प्रसाद माळी
सांगली : सोलापूरसह मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
यामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाली असून, सध्या बाजारात दाखल नव्या डाळींचे दर १५ ते २० टक्क्यांनी भडकले आहेत.
सांगलीच्याबाजाराततूरडाळीत १५ टक्क्यांनी, तर उडीद डाळीमध्ये २५ टक्कांनी वाढ नोंदवली गेली आहे. सध्या तूरडाळ ११२ ते १३० रुपये प्रतिकिलो आहे. तर, उडीद डाळ ११५ ते १४० रुपये किलोवर पोहचली आहे.
महाराष्ट्रात सोलापूर, उस्मानाबादसह लातूर, बीड, परभणी या मराठवाड्यातील परिसरात कडधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे येथील कडधान्य पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात ३० ते ३५ टक्कांची घट झाली आहे. याचा परिणाम कडधान्य आणि डाळींच्या बाजारावर झाला आहे.
जानेवारीपासून नवा माल बाजारात येतो. घटत्या उत्पादनामुळे तूर, उडीद आणि मूग डाळींचे दर वाढले आहेत. जानेवारी महिन्यात तूरडाळीचे दरात २५ टक्कांची वाढ होऊन प्रतिकिलो १२२ ते १४० पर्यंत पोहचले होती.
त्यात फेब्रुवारीमध्ये घट होऊन सध्या ११२ ते १३० रुपये किलो वर पोहचले आहे. हाच दर डिसेंबरमध्ये ९३ ते ११० किलो इतका होता.
डाळींचे भाव (प्रतिकिलो)
डाळी - फेब्रु. २०२६ - डिसें. २०२५
तूर डाळ - ११२ ते १३० - ९२ ते ११०
उडीद डाळ - ११५ ते १४० - ८५ ते ११०
मूग डाळ - १०० ते ११० - ९० ते १००
मसूर डाळ - ७५ ते ८५ - ८० ते ९०
हरभरा डाळ - ६५ ते ७५ - ७५ ते ८०
उडीद डाळीमध्ये २५ टक्क्यांची वाढ
◼️ उडीद डाळीच्या दरातही तेजी आली आहे. उडीद डाळीमध्ये २५ टक्क्यांची वाढ झाली असून, डिसेंबरमध्ये ८५ ते ११० रुपये किलो असणारी उडीदडाळ फेब्रुवारीमध्ये ११५ ते १४० रुपये किलोवर पोहचली आहे.
◼️ सांगलीमध्ये आंध्रप्रदेशच्या गुंटूर परिसरातून उडीदडाळ येत असून, तेथेही पावसामुळे उडीद पिकांचे उत्पादन घटले आहे.
सोलापूर, मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे डाळीच्या उत्पादनात घट झाली आहे. लातूर, बार्शीमधून येणाऱ्या मालास दक्षिणेकडील राज्यातील बाजारात सर्वांत आधी उचलला गेला. त्याचाही परिणाम दरवाढीवर झाला आहे. - गजानन पाटील, होलसेल डाळी व धान्याचे व्यापारी, मार्केट यार्ड सांगली
