पारनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (दि. ३) झालेल्या लिलावात कांद्याच्या भावात किंचित वाढ झाली.
चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या नऊ गोण्यांना १६ रुपये प्रति किलो भाव मिळाल्याची माहिती सभापती गंगाराम बेलकर व उपसभापती संदीप सालके यांनी दिली.
अनेक दिवसांपासून भाव नसल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजी होती. त्यात आता वाढ झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. बाजार समितीच्या आवारात रविवारी २४ हजार २३ कांदा गोण्यांची आवक झाली.
चांगल्या प्रतीच्या ५ ते १० वक्कलला १४०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याचे सचिव सुरेश आढाव यांनी सांगितले. बुधवारच्या लिलावात १२ हजार ८४९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यात रविवारी दुप्पट वाढ झाली.
रविवारी एक नंबरच्या कांद्यास १२०० ते १३०० रुपये, दोन नंबर ९०० ते ११०० रुपये, तर तीन नंबरच्या कांद्यास ६०० ते ८०० रुपये भाव मिळाल्याची माहिती माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी दिली.
त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा वाळवून, सुखवून व प्रतवारी करून आणावा, असे आवाहन बाजार समिती संचालक मंडळाने केले आहे.
दर नसल्याने कांदा चाळीत
◼️ गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कांद्याला भाव नसल्याने रब्बी हंगामात काढलेला कांदा शेतकऱ्यांनी आता चाळीत साठवायला सुरुवात केली आहे.
◼️ मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.
◼️ सध्या उत्पादन खर्च व भाव नसल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे.
◼️ त्यामुळे कांद्याला किमान २५ रुपये किलो हमीभाव द्यावा, अशी मागणी होत आहे.
अधिक वाचा: द्राक्ष शेतीतून नगर जिल्ह्यातील 'हे' गाव झालं करोडपती; जमिनीचा दर चाललाय एकरी ५० ते ६० लाख रुपये
