नामदेव मोरे
नवी मुंबई : अमेरिका-इराणयुद्धामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असल्याने भारतातून भाजीपाला व इतर कृषीमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.
ही स्थिती कायम राहिल्यास पुढील महिन्यात आंबा निर्यातीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भारतामधून आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळे, भाजीपाला व कृषी उत्पादनांची निर्यात केली जाते, तर त्या देशांतून खजूर व सुकामेवा भारतात आयात होतो.
गतवर्षी आखाती देशांबरोबर तब्बल २००८ कोटी रुपयांची निर्यात आणि ६६७० कोटी रुपयांची आयात झाली होती.
चालू आर्थिक वर्षातही निर्यात समाधानकारक होती; मात्र सध्याच्या युद्धजन्य स्थितीमुळे आयात-निर्यात व्यापारावर मोठा परिणाम दिसू लागला आहे.
सध्या हवाई मार्गे होणारी निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. समुद्री मार्गावरील व्यापार सुरू असला, तरी संघर्ष दीर्घकाळ चालल्यास त्यावरही परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
खजूर आयातीला फटका
पुढील पंधरा दिवसांत खजूराची मोठी आयात अपेक्षित होती; परंतु युद्धामुळे या व्यापारालाही फटका बसू शकतो. सध्या रमजान महिना सुरू असल्याने मुस्लीम बांधवांच्या उपवासाला त्याची झळ पोहोचणार आहे.
युद्धग्रस्त देशांसोबत २०२४-२५ मधील निर्यात
| क्रमांक | देश | टन | कोटी रुपये |
|---|---|---|---|
| १ | यूएई | ८९,३९३ | १,३७९ |
| २ | इराण | ४५६ | ३.७२ |
| ३ | इराक | ३,५५८ | ३६.२४ |
| ४ | सौदी अरेबिया | १३,९६५ | २६३ |
| ५ | इस्त्रायल | ४,८३९ | ७६.२५ |
| ६ | जॉर्डन | ४२६ | १३.०७ |
| ७ | कतार | ६,८५२ | १२३.१८ |
| ८ | बहारीन | १,९५६ | ३७.९५ |
| ९ | कुवेत | ४,००३ | ७६.४३ |
| एकूण | १,२५,४४८ | २,००८.८४ |
युद्धग्रस्त देशांसोबत २०२५-२६ मधील निर्यात
| क्रमांक | देश | टन | कोटी रुपये |
|---|---|---|---|
| १ | यूएई | ३,५१,०४२ | ३,३९८ |
| २ | इराण | २,९५,६०८ | २,२९७ |
| ३ | इराक | ३,२३,४९२ | ७०८ |
| ४ | सोदी अरेबिया | १५,०५२ | १३०.५७ |
| ५ | इस्त्रायल | ३,१६४ | ११९.६८ |
| ६ | जॉर्डन | ३८६ | ९.४५ |
| ७ | कतार | १४६ | २.४० |
| ८ | बहरीन | १८ | ४.३६ |
| ९ | कुवेत | १३३ | ०.४३ |
| एकूण | ८,८९,०४४ | ६,६७० |
आखाती देशांमध्ये फळे व भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. युद्धामुळे हवाई मार्ग बंद झाल्याने निर्यात बंद थांबली आहे. - संजय पानसरे, संचालक, बाजार समिती
अधिक वाचा: यंदा कसा राहणार उन्हाळा? राज्यात कोणत्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक असणार?
