योगेश बिडवई
मुंबई : कांद्याला कृषी उत्पन्न बाजार समितीत कुठे ५० पैसे, कुठे एक रुपया, कुठे दोन रुपये किलो असा दर मिळत आहे.
भराई, हमाली-तोलाई, वाहतूक भाडे, मार्केट फी जाऊन शेतकऱ्यांना वर खिशातून पैसे भरावे लागत आहेत.
कांद्याने शेतकऱ्यांचे पुरते पानिपत केले असताना शहरांमध्ये मात्र ग्राहकांना २० ते २५ रुपये किलोने कांदा मिळत आहे.
नाशिकच्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी जितेंद्र साळुंखे यांच्या कांद्याला ५० पैसे किलो दर मिळाला. आंदोलन केल्यावर व्यापाऱ्याने अवघा दीड रुपयाचा दर दिला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी प्रकाश गलधर यांच्या कांद्याला १ रुपया किलो दर मिळाला. १,२०० किलो कांदा विकल्यावर हमाली, वाहतूक भाडे वजा केल्यावर त्यांना खिशातून १ रुपया भरावा लागला.
सोलापूरमध्ये अंकुश गुंजाळ यांनी ७३ गोनी कांदा विकला व त्यांच्या हातात आले फक्त ४०० रुपये.
कधी मिळेल कांद्याला भाव?
◼️ पावसापासून वाचलेल्या चांगल्या कांद्याला पुढच्या १५ दिवसांत चांगले भाव मिळण्याची अपेक्षा आहे.
◼️ ८ ते १० दिवसांत निर्यातीत सुधारणा होऊन देशांतर्गत बाजारपेठेत भाव वाढण्याची आशा आहे.
कशामुळे झाला वांदा?
◼️ सध्या राज्यात कांद्याची आवक वाढली आहे, तुलनेत मोठी मागणी नाही.
◼️ काही ठिकाणी अवेळी पावसामुळे कांद्याची प्रतवारी खराब झाली आहे.
◼️ मध्य प्रदेशातही पावसाचा कांद्याला फटका बसला आहे.
◼️ प्रतवारी करताना व्यापाऱ्यांना १० ते १५ टक्के माल बाजूला काढावा लागतो.
◼️ तापमान वाढल्याने कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे.
परदेशात कांद्याला सध्या मागणी नाही. कांदा पाणी सोडत असल्याने परदेशात माल पाठविणे मोठा धोका पत्करण्यासारखे आहे. तेथे कांदा पोहोचेपर्यंत खराब झाला तर पैसे मिळणार नाहीत. युद्धकाळात अनेक देशांमध्ये कांदा पोहोचण्यास उशीर झाला. त्यातून निर्यातदारांना फटका बसला. पुढच्या ८ ते १० दिवसांत निर्यातीची परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे. - नितीन जैन, कांदा निर्यातदार
अधिक वाचा: शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला अखेर मंजुरी; आता 'या' १३ जिल्ह्यांतून जाणार हायवे
